जादूटोणाविरोधी कायद्याचा अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. कायद्याच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच गृह शाखेच्या नायब तहसीलदार अर्चना पागिरे यांना निवेदन देण्यात आले.
शहरातील गांधी मैदानातून निघालेला मोर्चा प्रमुख रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. तेथे झालेल्या सभेत हभप रामदास महाराज क्षीरसागर, हभप गोविंद महाराज हंडे यांची भाषणे झाली. हभप रामदास महाराज शेंडे, हभप प्रभाताई भोंग, हभप स्वानंद महाराज जोशी, रामदास गुंजाळ, प्रवीण आंबेकर, सुनील गवळी तसेच गीता भागवत वारकरी सेवा मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश काढताना धार्मिक संघटनांच्या सूचनांचा विचार केला गेला नाही, अध्यादेशात धर्मावर आघात करणारी कलमे तशीच ठेवली गेल्याने तो रद्द करावा, या आदेशाने भाविक व श्रद्धाळू जनतेला दिलासा मिळण्याऐवजी त्यांच्यापुढील अडचणी वाढणार आहेत, अध्यादेशात अनेक त्रुटी आहेत, असे समितीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.