माथाडी कामगारांचे प्रश्न त्वरित सोडविले गेले नाही, तर जुलैमध्ये होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेवर, हमाल-माथाडी कामगारांचा प्रचंड मोर्चा काढला जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष व मराठवाडा लेबर युनियनचे अध्यक्ष सुभाष लोमटे यांनी दिला.माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा, संपलेले वेतन करार तत्काळ पूर्ण करा, करार फक्त २ वर्षांचे करा, काढलेल्या कामगारांना त्वरित कामावर घ्या, हमाल कष्टकऱ्यांना पेन्शन व दोन रुपये किलोने धान्य द्या इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. क्रांती चौकातून निघालेला हा मोर्चा गुलमंडी-शहागंजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चाचे नेतृत्व सुभाष लोमटे, सुभाष गायकवाड, सुधीर देशमुख व देविदास कीर्तिशाही यांनी केले. मोर्चानंतर शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांना मागण्यांचे निवेदन दिले.