गारपिटीचा तडाख्यातून काही प्रमाणामध्ये वाचलेला मका शेतकरी बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धाड यार्डात विक्रीसाठी घेऊन येत आहेत. मात्र, तेथील व्यापारी आद्रतेच्याच्या नावाखाली अतिशय अल्प प्रमाणामध्ये भाव देऊन शेतकऱ्यांची मोठय़ा प्रमाणामध्ये आर्थिक लूट करीत आहेत.
गारपिटीचा तडाख्यामुळे पिके उद्ध्वस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटंबाचा एकच आक्रोश सुरू झाला. शेतकरी हवालदिल झाला, पण सतत येणाऱ्या संकटाशी सामना करणारा शेतकरी खचून गेला नाही. शिल्लक राहिलेले पीक मग तो हळूहळू जमा करू लागला. यामध्ये भुईसपाट झालेला गहू, हरभऱ्याच्या फुटलेल्या ओंब्या वेचून त्याचे खळे करून ते धान्य जमा केले.  गारपिटीमुळे ओली झालेली मका शेतकऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून शेतामध्येच सुकून मशीनव्दारे मळणी करून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांना विक्रीसाठी आणली. मात्र, गारपिटीच्या नावाखाली कोणताही निकष न लावता मकामधील आद्रतेचे क्िंवटलमागे १०० ते २०० रुपये शेतकऱ्यांना कमी देण्यात येत आहेत.  मकामधील आद्रता मोजण्यासाठी डिजिटल मॉईश्चर मीटरव्दारे आद्रता तपासली जाते. मात्र, शेतकऱ्यांचीच दिशाभूल करून आर्थिक लूट करण्यात येते ही पध्दतच चुकीची असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. या संदर्भात काही शेतकऱ्यांनी जाब विचारला असता त्या शेतकऱ्यांचा माल घेण्यात येत नाही. किंवा नकार देतात. माल घेतल्यानंतर मालाचे पैस ते २० दिवसानंतर देण्यात येतात. इलेक्ट्रिक काटा नसल्यामळे पाच ते सहा किलोची घट शेतकऱ्यांना क्िंवटलमागे मिळते. शेतकऱ्यांच्या मालाच्या किमती ठरविण्याचा अधिकार हा व्यापाऱ्यांनी आपल्या हाती घेतला आहे. त्यामुळे त्यांची मनमानी एकाधिकारशाही संपविणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची खरी आर्थिक लूट होत असते तर ती याच व्यापाऱ्याव्दारे होते. शेतकरी काबाडकष्ट करून विक्रमी खळयावरील एक एक पिकाचा दाणा वेचून व्यापाऱ्यांना देतो, पण व्यापारी त्यांना त्याच्या मालाचा मोबदला देत नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भावच मिळत नसल्यामुळे शेतकरी शेवटी आपला माल कवडी मोल भावामध्ये व्यापाऱ्यांना विकून टाकतो. येथेच शेतकऱ्यांचे मनोबल खचते. शेतीला लागलेला खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ कुठेच जुळत नसल्यामुळे शेतकरी हा वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करण्यास तयार होत आहे.