महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला ‘नागपूर फर्स्ट’तर्फे दिला जाणारा उत्तम पायाभूत सुविधा आणि पर्यावरणाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
एम.ए.डी.सी.ने २००४ मध्ये मिहान विकसित करण्यास प्रारंभ केला. यावेळी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख या कंपनीचे अध्यक्ष होते. तर कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर.सी. सिन्हा होते.
३१ एकरमध्ये मूलभुत सुविधा विकसित करण्यात आल्या. यात ५१ किमी आंतरिक रस्ते, पथदिवे, उड्डाणपूल, मध्यवर्ती सुविधा इमारत, जल शुद्धीकरण केंद्र, मलनिस्सारण केंद्र, अग्निशमन केंद्र, दूरसंचार केंद्र, वीज उपकेंद्र इत्यादी सुविधांचा समावेश आहे. या सर्व कामासाठी एक हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आणि या सुविधा विकसित करण्यास दहा वर्षे लागली.
पायाभूत सुविधा हे मिहानचे बलस्थान आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मूलभूत सुविधा ही मिहानची विशेषता आहे. यामुळे देश-विदेशातील अभ्यागत येथे आले आणि येथील सुविधांची प्रसंशा केली. सध्या येथे विविध कंपन्यांचे विकास कार्य प्रगतीपथावर आहे. टीसीएसचा ५४ एकरमधील सुमारे ११ लाख वर्ग फूट बांधकाम असलेल्या आयटी कॅम्पसमध्ये साडेचार हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच एअर इंडिया करिता बोईंगद्वारे उभारण्यात येत असलेला महत्त्वाकांक्षी एमआरओ प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. या प्रकल्पाशी सुरुवातीपासून मुख्य अभियंता सुभाष चहांदे, अधीक्षक अभियंता एस.के. चटर्जी, एमएडीसीचे माजी कार्यकारी अभियंता एम.एम. जयस्वाल, प्रकल्प व्यवस्थापक आबिद रुही, भूसंपादन सल्लागार एम. झेड. हिकरे, विद्युत सल्लागार के.आर. इंगोले जुळलेले आहेत. त्याचा मोलाचा वाटा या पुरस्कारात आहे, असे एमएडीसीचे जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी म्हणाले.