नाशिकरोडच्या जयभवानी रस्त्यावरून १४ वर्षीय मुलीचे नातेवाईकांनी अपहरण केल्याप्रकरणी चार जणांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणी शालिग्राम धबडधव यांनी तक्रार दिली आहे. आपली मुलगी गायत्री ही घराबाहेर गेली असताना नातेवाईक व इतर काहींनी घरात जाणीवपूर्वक कोणाला काही न सांगता तिला परस्पर घेऊन गेले. या प्रकरणी दीपक लोखंडे, गोविंद लोखंडे, आशा लोखंडे व एका मुलीचा या प्रकारात सहभाग असल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला. जयभवानी रस्त्यावरील पाटोळे मळ्यातील खंडोबा मंदिराजवळ हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु अद्याप कोणाला अटक झाली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.