उरण पनवेल राज्य महामार्गलगतच्या फुंडे येथील तलावातून कासव पकडणाऱ्या ८ अल्पवयीन मुलांना वनविभागाने मंगळवारी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण ३६ कासव ताब्यात घेण्यात येऊन त्यांना रानसई येथील धरणात सोडण्यात आले.  ४ ते १२ वयोगटातील ही मुले आहेत, अशी माहिती वनविभागाने दिली आहे.
उरण पनवेल रस्त्यालगतच्या नवी मुंबई सेझ कंपनीच्या परिसरात असलेल्या फुंडे येथील तलावात नवघर फाटय़ावरील झोपडपट्टीत ही आठ मुले राहतात. याबाबतची माहिती चिर्ले येथील सर्पमित्र आनंद मढवी यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या सहकार्यासह या मुलांना घेऊन उरण पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर उरण पोलिसांनी या मुलांना वनविभागाच्या ताब्यात दिले आहे.या संदर्भात उरणच्या वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता वनजीव संरक्षण कायदा १९७४च्या कलम २९, ५३ व ५४अ नुसार परवानगीशिवाय वन्यजीव पकडणे, त्यांना त्यांच्या नैसर्गिक स्थानापासून हटविण्याचा गुन्हा झाला आहे. याबाबत  चौकशी सुरू असल्याची माहिती उरण वनविभागाचे वनपाल चंद्रकांत मराठे यांनी दिली आहे.