बारावीच्या अकाउंट्स विषयाचा पेपर फुटल्यानंतरही दोषींवर कारवाई करण्यात आलेली नाही. कारवाई करण्याची जबाबदारी शिक्षण मंत्र्यांवर होती, या प्रकारांची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी शुक्रवारी मनसेच्यावतीने उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेतील अकाउंट्स विषयाच्या प्रश्नपत्रिकाा फुटल्या. फेसबुक आणि व्हॉट्स अॅपद्वारे त्या पाठविल्या गेल्या. दहावी व बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात महत्वपूर्ण असतात. त्यांचे भवितव्य या परीक्षांवर अवलंबून असते. या परीक्षांबाबत ंमंडळ गंभीर नसल्याची तक्रार मनसेचे जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी केली. कोंबडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी द्वारकालगतच्या मंडळाच्या कार्यालयावर घोषणाबाजी केली. मंडळ कॉपीसारख्या गैरमार्गाशी लढा देत असताना काही घटक प्रश्नपत्रिका फोडतात. शिक्षण मंत्र्यांचा मंडळाच्या कारभारावर कोणताही अंकुश नाही. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याची तक्रार आंदोलकांनी केली. शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात पेपर फुटण्याची घटना घडली. तत्पुर्वी १२ नोव्हेंबरला अभियांत्रिकीचे पेपर फुटले होते. पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या एमबीएचे पेपर परीक्षेआधीच फुटले होते. यामुळे पुन्हा पेपर घेण्याची वेळ आली. कल्याण येथेही वाणिज्य शाखेचे पेपर फुटले. या सर्व घटनानंतरही दोषींवर कारवाई करण्यात आली नसल्याचा आक्षेप आंदोलकांनी नोंदविला. त्याची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी शिक्षण मंत्र्यांची आहे. ही जबाबदारी टाळून शिक्षण मंत्री निव्वळ घोषणा करण्यात मग्न आहेत, असा आरोप करत या सर्व प्रकाराची जबाबदारी स्वीकारून तावडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसेने केली.