कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने १९ मार्चला विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघटनेने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला असून सरकारी दुर्लक्षाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
संघटनेचे राज्य अध्यक्ष भास्करराव जऱ्हाड तसेच जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, कार्याध्यक्ष आश्रुबा फुंदे, नवनाथ टकले, भाऊसाहेब कचरे यांनी सांगितले की, सरकार कारवाईच्या धमक्या देत आहे, मात्र सर्व शिक्षक त्यांचे नियमित काम करत आहेत. उत्तरपत्रिका तपासणीचे काम मोबदल्याचे काम आहे. ते केले नाही म्हणून कारवाई करण्याचा अधिकार सरकारला नाही. सर्व संस्थाचालकही शिक्षकांच्या बाजूने असून त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे कोणीही शिक्षकाने विचलित होऊ नये व मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन जऱ्हाड, कचरे, विधाते, फुंदे यांनी केले आहे.