मुंबईतले गँगवॉर संपले असले असे जरी वरकरणी वाटत असले तरी आजही टोळ्यांमधील वर्चस्वाची लढाई सुरू असून गुन्हेगारांच्या काळ्या कारवाया सुरू आहेत. अगदी सिनेमाप्रमाणे ते व्यापाऱ्यांना खंडणीसाठी गोळीबार करून धमकावणे, प्रतिस्पध्र्याना संपविण्याचे कट आखत असतात. गुन्हे शाखा तीनच्या पथकाने एका कुख्यात टोळीच्या म्होरक्याला अटक केल्यानंतर हा गुन्हेगारीचा पट समोर आला आहे. या टोळीच्या म्होरक्याला आपल्या माजी बॉसला संपवून त्याच्या टोळीवर वर्चस्व निर्माण करायचे होते. या टोळीचा शोध लागला तो एका गोळीबार प्रकरणातून. मुंबई पोलिसांनी गुंड टोळ्यांचे वर्चस्व संपविण्यासाठी बेकायदेशी शस्त्र पुरविणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली होती. त्यामुळे गोळीबाराच्या घटना थांबल्या होत्या. परंतु एप्रिल २०१५ मध्ये शिवडीच्या वाडिया रोडवर गोविंद कामतेकर या इसमावर गोळीबाराची घटना घडली. या गोळीबरातून कामतेकर थोडक्यात बचावले. पण मुंबई पोलिसांची झोप उडवली. आर्थिक वादातून हा हल्ला झाला परंतु गुंड टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचे ते चिन्ह होते. सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अतुलचंद्र कुलकर्णी यांनी या टोळीची पाळेमुळे खणण्याचे आदेश दिले. गोळीबार करणारे प्रमोद सावंत आणि संतोष परब यांना एकामागोमाग एक गुन्हे शाखा तीनच्या पथकाने पकडले. पण टोळीचा म्होरक्या अनिल रांबाडे असल्याचे समजले. गुन्हे शाखा या अनिल रांबाडेच्या मागे लागली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांबाडे हा अतिशय चाणाक्ष गुन्हेगार होता. मन्या सुर्वे ज्याप्रमाणे आपल्याबाबतचा कुठलाही थांगपत्ता लागू देत नव्हता तसा रांबाडे पोलिसांना चकमा देत होता. परंतु गुन्हे शाखा तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद सावंत, पोलीस निरीक्षक संजय निकुंबे, दीपक चव्हाण, यांच्या पथकाने त्याचा माग सुरूच ठेवला. अखेर त्याला भांडुप येथे अटक करण्यात आली. त्याच्याकडून सहा पिस्तुले, १९ काडतुसे जप्त करण्यात आली. अनिल रांबाडे हा सराईत गुन्हेगार होता. तो भांडुपच्या अमित भोगलेच्या टोळीत काम करत होता. २००९ मध्ये कोकणातील आमदार वैभव नाईक यांच्यावरील गोळीबाराचा तो सूत्रधार होता. त्या वेळी त्याला अटकही झाली होती. भोगलेबरोबर झालेल्या आर्थिक वादातून रांबाडे बाहेर पडला. भोगलेला संपवण्याचा त्याने कट रचला होता. ११ एप्रिल रोजी रांबाडे टोळीने कामतेकरवर गोळीबार केला. सहसा एखादा गुन्हा घडली की, गुन्हेगारी टोळ्या भूमिगत होतात; परंतु रांबाडे यांनी या घटनेच्या लगेच तिसऱ्या दिवशी म्हणजे १६ एप्रिल रोजी ठाण्यातील एका विकासकावर खंडणीसाठी गोळीबार केला होता. यानंतर तो आपला माजी बॉस अमित भोगलेला संपविणार होता; परंतु त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला जेरबंद करून टोळीयुद्धाचा भडका होण्यापासून थांबवलं. अतिरिक्त पोलीस आयुक्त एमएम प्रसन्ना, पोलीस उपायुक्त मोहन दहिकर, पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी, साहाय्यक पोलीस आयुक्त प्रफुल्ल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.