नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी शुक्रवारी रणरणत्या उन्हात ढोल-ताशांचा गजर, कव्वालीची साद आणि पक्षीय झेंडे फडकावत भव्य फेरी काढून काँग्रेस आघाडीतर्फे छगन भुजबळ, मनसेचे डॉ. प्रदीप पवार तर महायुतीचे हेमंत गोडसे यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. दुसरीकडे आदल्या दिवशी तांत्रिक अडचणींमुळे अर्ज दाखल करू न शकलेले आम आदमी पक्षाचे उमेदवार विजय पांढरे यांनी कोणताही गाजावाजा न करता अर्ज दाखल करणे पसंत केले. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी दिग्गज नेते व हजारो समर्थकांना सहभागी करत फेरीद्वारे जोरदार शक्ति प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. शालिमार चौकात महायुती आणि मनसेच्या फेरींचा आमना-सामना होत असताना समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याची शनिवार अखेरची मुदत आहे. या प्रक्रियेसाठी जो कालावधी मिळाला, त्यातील शुक्रवार हा दिवस अर्ज सादर करण्यासाठी शुभ असल्याचे भाकीत काही ज्योतिषांनी वर्तविले होते. त्यामुळे या दिवशी प्रमुख उमेदवारांनी अर्ज सादर करून तो मुहूर्त साधल्याचे पहावयास मिळाले. एकाच दिवशी तिन्ही पक्ष अर्ज सादर करणार असल्याने पोलीस यंत्रणेने फेरीला परवानगी देताना स्वतंत्र मार्ग व वेगळी वेळ दिली होती. परंतु, एकाही पक्षाने त्याचे पालन केले नाही. काँग्रेस आघाडीचे नाशिक मतदार संघातील उमेदवार छगन भुजबळ व दिंडोरी मतदार संघातील डॉ. भारती पवार यांच्या फेरीला दोन तासाच्या विलंबाने काँग्रेस कमिटीपासून सुरूवात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासह काँग्रेसची स्थानिक नेते मंडळी उपस्थित होती. हजारो महिला व पुरुष कार्यकर्ते फेरीत सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाइं (कवाडे गट) पक्षाच्या झेंडय़ांनी फेरीचा मार्ग फुलला होता. अशोक स्तंभ, रविवार कारंजा मार्गे या फेरीचा समारोप यशवंत व्यायामशाळेच्या मैदानावर झाला.मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांच्या फेरीला पंचवटी कारंजापासून सुरूवात झाली. मनसे महिला आघाडीच्या शर्मिला ठाकरे, प्रदेश सरचिटणीस वसंत गिते, आ. उत्तम ढिकले, महापौर अॅड. यतीन वाघ फेरीत सहभागी झाले. कव्वालीची साद घालत हजारो कार्यकर्ते फेरीत सहभागी झाले. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या फेरीला शालीमारच्या शिवसेना कार्यालयापासून सुरूवात झाली. लगतच्या चौकातून मनसेची फेरी सीबीएसकडे मार्गस्थ होत असल्याने दोन्ही बाजुंच्या कार्यकर्त्यांना जोर चढला. या ठिकाणी दोन्ही बाजुंच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही फेरींचा मार्ग स्वतंत्र असल्याने पोलिसांनी समर्थकांचा उत्साह घोषणाबाजी पलीकडे जाणार नाही, याची दक्षता पोलिसांनी घेतली. त्यामुळे लांब अंतरावरून घोषणा देत या फेरी वेगवेगळ्या दिशेने मार्गस्थ झाल्या. महायुतीच्या फेरीत शिवसेना प्रवक्त्या निलम गोऱ्हे, संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर, आ. बबन घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, रिपाइंचे प्रकाश लोंढे आदी उपस्थित होते. रणरणत्या उन्हात निघालेल्या या दोन्ही पक्षांच्या फेऱ्यांमध्येही हजारो समर्थक सहभागी झाले होते. त्यात महिलांची संख्याही मोठी होती. अर्ज दाखल करताना जोरदार शक्ति प्रदर्शन करत उमेदवारांनी आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. हे काय जनतेचा विचार करणार - अजित पवारकोणी वडय़ाचे तेल काढतेय तर कोणी सुप काढतोय. घरातील वाद असे चव्हाटय़ावर आणायचे नसतात. परंतु, दोन्ही भावडांकडून हे प्रकार सुरू असून ते काय राज्यातील जनतेला विचार करणार, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील वादावर बोट ठेवले. भाजपचे नरेंद्र मोदी यांचे एकखांबी नेतृत्व देशाला पुढे नेऊ शकत नाही. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनाही मोदींनी अडगळीत नेऊन बसविले. दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा सेना-भाजपचा प्रयत्न आहे. शिवसेनेला नेतृत्व राहिले नसून त्या पक्षाला गळती लागल्याचे पवार यांनी सांगितले. मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात लघू संदेशाद्वारे अफवा पसरविल्या जातात. परंतु, त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. शेतकरी व गोरगरिबांचा विचार काँग्रेस आघाडी शासनाने अनेकविध योजना राबविल्या. आपत्तीग्रस्तांना दुप्पट मदत दिली, असा दावाही पवार यांनी केला.