विदर्भातील दोन महत्त्वाच्या शहराला जोडणारी आणि सर्व सामान्य प्रवाशांची गाडी समजली जाणारी नागपूर-अमरावती पॅसेंजर गाडीला नागपूर रेल्वेस्थानकावर वेळेत फलाट उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना खापरी रेल्वे स्थानकावर अर्धा ते एक तास तिष्ठत राहावे लागत आहे. नागपूर ते अमरावती मार्गावर अनेक गाडय़ा आहेत. परंतु या दोन शहरामधील सुमारे वीस गावांसाठी पॅसेंजर गाडी जीवनदायिनी आहे. या गावातील नागरिकांना नागपुरात येण्यासाठी ही गाडी सोयीची ठरत आहे. मात्र अन्य सुपरफास्ट गाडय़ांचा मार्ग मोकळा करण्यासाठी या गाडीला अनेक रेल्वेस्थानकावर थांबवून ठेवल्या जात आहे. या गाडीचे अमरावतीहून प्रस्थान दुपारी १.३० वाजताचे आहे. तेथूनच ही गाडी उशिरा निघते आणि नागपुरात रात्री पावणेच्या ऐवजी विलंबाने पोहोचते. या गाडीला १७४ किलोमीटर अंतर कापण्यासाठी तब्बल सव्वासात तास लागतात. अमरावती ते नागपूर एसटीचा प्रवास तीन ते साडेतीन तासांचा आहे. या गाडीची आधीच गती कमी असताना ठिकठिकाणी विनाकारण अर्धा ते एक तास थांबवून ठेवण्यात येत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. नागपूर ते अमरावतीदरम्यान अजनी, खापरी, गुमगाव, बुटीबोरी, बोरखेडी, सिंधी, तुळजापूर, सेलू, वरुड, सेवाग्राम, वर्धा, दहेगाव, कवठा, पुलगाव, तळणी, धामणगाव, दिघोरी, चांदूर, मालखेड, तिमंताळा हे थांबे आहेत. या भागातून नागपुरात दररोज नागपुरात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे पॅसेंजर गाडीला नेहमीच गर्दी असते. परंतु रेल्वे प्रशासनाने अमरावती ते नागपूरदरम्यानच्या गावकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेल्या गाडीला दुर्लक्षित केल्याने दिसून येत आहे. नागपूरहून निघणारी पॅसेंजर दुपारी ४.५० वाजता निघते आणि अमरावतीला रात्री ८.५५ वाजता पोहोचते. ही गाडी चार तास पाच मिनिटे अमरावतीला पोहोचण्यासाठी घेते. मात्र अमरावतीकडून नागपुरात येणारी गाडी त्यापेक्षा तीन तास दहा मिनिटे अधिक घेते. त्यातही नियोजितवेळेपेक्षा ही गाडी सातत्याने विलंबाने धावत आहे.गेल्या महिन्यात अमरावती ते नागपूर पॅसेंजरला वर्धा आणि त्यानंतरच्या काही स्थानकावर विलंब होत आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या गाडय़ा नागपूर स्थानकावर उशिरा येत असल्याने फलाट मिळत नाही. यामुळे या गाडीला खापरी किंवा इतर रेल्वे स्थानकावर थांबवावे लागते. ही गाडी नियोजितवेळी फटलावर पोहोचावी, यासाठी प्रयत्न केले जातील, असे मध्य रेल्वेचे विभागीय संचालन व्यवस्थापक अतुल राणे म्हणाले.