नरक्याची तस्करी करणा-या पाचजणांच्या टोळक्याला गुरुवारी करवीर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सव्वापाच लाख रुपये किमतीच्या नरक्या वनस्पतीसह पावणेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सर्जेराव श्रीपती सुतार (वय २२), सागर आनंदा केसरकर (वय २२), किशोर बळवंत पताडे (वय २५), धाकलू भागू पटकारे (रा. सर्व. राधानगरी तालुका), सागर बाळू धुमाळ (वय २६) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. परिते ते ठिकपुर्ली रोडवर परिते गावच्या हद्दीमध्ये एक क्रशर आहे. तेथे उपरोक्त आरोपी नरक्या वनस्पतीची लाकडे विनापरवाना आणून तिची बेकायदेशीर वाहतूक करीत होते. ही माहिती करवीर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तेथे धाड टाकली. पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर भारतीय वनअधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींकडून ७ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये १२८५ किलो नरक्या वनस्पती, महिंद्रा मॅक्स कंपनीची पिकअप व्हॅन, दोन दुचाकी, तीन मोबाइल आदींचा समावेश होता. याबाबत पोलीस नाईक संजय गोविंद जाधव यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. धाकलू भागू पटकारे हा आरोपी फरारी आहे.