सुदृढ आरोग्यासह पर्यावरणाचा संदेश देत येथील अंबड डीजीपीनगर क्रमांक दोनपासून नाशिक ते शेगाव अशी सायकल यात्रा शहरातील पर्यावरणप्रेमी यात्रेकरूंनंी काढली आहे.सीताराम भांड, प्रकाश देशपांडे, गिरीश देशपांडे, कैलास अहिरे, अशोक खैरनार यांचा त्यात समावेश असून गुरुवारी सकाळी ते शेगावकडे रवाना झाले. नाशिक ते शेगाव सायकल यात्रेचे हे १४ वे वर्ष असून डीजीपीनगर येथील भांड न्यूज पेपर एजन्सीचे संचालक प्रल्हाद भांड यांनी या सायकल यात्रेला सुरुवात केली. ११ वर्षे भांड यांनी ही सायकल यात्रा पूर्ण केली. तीन वर्षांपासून ते नर्मदा परिक्रमा करत असल्याने त्यांचे लहान बंधू सीताराम भांड व त्यांचे सहकारी या सायकल यात्रेची परंपरा पुढे चालवीत आहेत. नाशिक, मालेगाव, पारोळा, मुक्ताईनगर व शेगाव असा ४५० किलोमीटरचा प्रवास रोज ११० किलोमीटर याप्रमाणे सायकल चालवून ही मंडळी पूर्ण करणार आहेत. शेगाव येथील पारायण सोहळा आटोपल्यानंतर नाशिकला येताना ते एसटीने प्रवास करणार आहेत. सायकल चालविल्यामुळे आरोग्य तर चांगले राहतेच, परंतु इंधनाचीही बचत होते. यासाठी सर्वानी सायकल चालविण्याचे आवाहन या सायकलयात्रींनी केले आहे.