तांत्रिक क्षमतेचा उत्कृष्ट वापर केल्याबद्दल देश पातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला. नवी दिल्ली येथील नॅचरल शुगर फेडरेशनच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.
२०११-१२ च्या गळीत हंगामात तांत्रिक क्षमतेचा पुरेपूर वापर केल्याबद्दल उच्च रिकव्हरी झोनमधील दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार डॉ. आंबेडकर कारखान्यास जाहीर झाला. याचे वितरण १९ डिसेंबरला केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. व्ही. थॉमस यांच्या हस्ते होणार असल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष जयंतीलाल पटेल, उपाध्यक्ष शंकरराव कोल्हे यांनी पत्राद्वारे कळविले आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अध्यक्ष अरविंद गोरे म्हणाले की, डॉ. आंबेडकर कारखाना उभारणीपासूनच काटकसर, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संगणकीकरण व पारदर्शक कारभार ही वैशिष्टय़े जपली आहेत. ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वागीण विकास हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून काम केल्याने मराठवाडय़ात सर्वाधिक गाळप व सर्वाधिक ऊसदर देण्यात यशस्वी ठरलो आहोत. हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार म्हणजे कारखान्याचे सभासद, शेतकरी, संचालक मंडळ, आंबेडकर परिवारातील कार्यकर्ते, अधिकारी, कामगार यांच्या संघटित प्रयत्नांचे फळ आहे.