ऑल इंडिया फेडरेशन ऑफ विमेन लॉयर्स, हरित कुंभ समन्वय समिती आणि अविष्कार यांच्यातर्फे शनिवारी सकाळी १० वाजता ‘पर्यावरण आणि कायदा’ विषयावर राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्राचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते होणार असून यावेळी जिल्हा न्यायाधीश आनंद करंजकर, महसूल आयुक्त एकनाथ डौले उपस्थित राहणार आहेत.या बाबतची माहिती विमेन लॉयर्सच्या अॅड. इंद्रायणी पटणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाकवी कालिदास कला मंदिरात हे चर्चासत्र होईल.त्यात पर्यावरण विषयक समस्या, संतुलन आणि विकास तसेच कायद्याची रचना आणि अंमलबजावणी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच उद्घाटनाच्या पहिल्या सत्रात, जैवविविधता, हरीत तंत्रज्ञान, प्रदुषण प्रतिबंध, पर्यावरण विषयक कायदे तसेच पर्यावरण वाद्यांपुढील आव्हाने या विषयांवर चर्चा होणार आहे. त्यात मॅगेसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंग, विधीज्ञ डॉ. अमी याज्ञिक, जैवविविधता सल्लागार डॉ. नंदकुमार मोघे सहभागी होणार आहेत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी अस्तित्वात असलेले कायदे व त्यांची अंमलबजावणी, उच्च व सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिके अंतर्गत दिलेले न्याय निवाडे व त्यातील नियम, नागरीकांची कर्तव्ये या विषयाबाबत सर्वोच्च व उच्च न्यायालयातील विधीज्ञ एम.सी. मेहता, अॅड. आशा नायर, अॅड. जमशेद मिस्त्री, अॅड. किरण भगालिया मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी हरित लवाद न्यायालयात होणारे निर्णय तसेच नुकसान भरपाई या विषयी खास माहिती दिली जाणार आहे. पर्यावरणाच्या रक्षणार्थ लढणाऱ्या नागरीकांपुढील आव्हाने या विषयी अॅड. असीम सरोदे, अॅड. प्रवर्तक पाठक आणि राजेश पंडीत मार्गदर्शन करणार आहेत. काही कायद्यांमध्ये आवश्यक बदल या बाबतही चर्चा होईल. चर्चासत्र सर्व नागरीकांसाठी खुले आहे. त्यात नागरीकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेस नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, अॅड. हेमंत गायकवाड, राजेश पंडीत, अॅड. गुप्ते, अविष्कार फोरमचे विद्येश नाशिककर उपस्थित होते. अधिक माहिती तसेच नाव नोंदणीसाठी अॅड. इंद्रायणी पटणी (९८२२४ २७०५४), अॅड. वैशाली गुप्ते (९८२२८ ४९९७४) यांच्याशी संपर्क साधावा.