‘आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाज्या, पण आजकाल भाज्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी रासायनिक खतांचा, विषारी कीटकनाशकांचा अमर्याद वापर केला जात आहे. अशा भाज्यांच्या सेवनामुळे आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत आहेत. म्हणूनच आपल्या अवतीभोवती नैसर्गिकपणे वाढणाऱ्या रानभाज्या, निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त ठरतील,’ असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांनी केले. निसर्गमित्र संस्थेच्या वतीने ‘ओळख रानभाज्यांची’ या पुस्तक प्रकाशनावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुरेश शिपूरकर होते. या वेळी प्रमुख उपस्थिती सत्यजित गुजर होते. डॉ. बाचुळकर म्हणाले, या पुस्तकात सुमारे ५४ रानभाज्यांची माहिती, त्यांची स्थानिक व शास्त्रीय भाषेतील नावे, त्यांचे औषधी गुणधर्म, आहारातील महत्त्व याची माहिती देण्यात आली आहे. गुजर म्हणाले, आपल्या सभोवताली समृद्ध वनस्पती संपदा आहे. शेतात, ओसाड पडीक जमिनीवर, बागेत, परसात, जंगलात अनेक वनस्पती आहेत. डॉ. अशोक वाली, डॉ. हरीश नांगरे, अनिल चौगले, निहाल शिपूरकर, खंडेराव भोसले, अजित अकोळकर, अवधूत वीर, उमाकांत चव्हाण, संदीप चव्हाण-बंदरे, ओंकार मोहिते उपस्थित होते. अनिल चौगुले यांनी प्रास्ताविक केले. श्यामराव कांबळे यांनी आभार मानले.