आंबा कृत्रिमरीत्या पिकविण्यासाठी कार्बाईड पावडर व त्याच्या पिशव्यांचा वापर न करता तो नैसर्गिकरीत्या पिकवून बाजारपेठेत ग्राहकांना उपलबध करून द्यावा असे आवाहन सातारचे अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त संपतराव देशमुख यांनी कराड येथे फाळांच्या व्यापाऱ्यांना केले. येथील शामराव पाटील फळे, फुले व भाजीपाला मार्केटमध्ये घेण्यात आलेल्या फळांच्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अन्नसुरक्षा अधिकारी आर. एस. बोडके, अन्न सुरक्षा अधिकारी रणजित पवार यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यासह फळव्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
संपतराव देशमुख म्हणाले की, सध्या बाजारपेठेत आंब्याची आवक वाढली आहे. ग्राहकांची मागणी वाढली असल्याने व्यापाऱ्यांनी ग्राहकांना नैसर्गिकरीत्या पिकवलेले आंबे विक्रीस ठेवावेत. आंबा पिकविण्यासाठी कार्बाईड पावडर तसेच त्याच्या पिशव्यांचा वापर करू नये. गवत, भाताचा पेंडा आदींद्वारे आंबे पिकवले जावेत. शक्य झाल्यास आंबे पिकविण्यासाठी रॅपिंग चेंबर्सचा वापर करावा. यावेळी काही व्यापाऱ्यांनी बाजारपेठेत आंब्याची मागणी वाढत असल्याने त्यावर पर्याय काय, असा प्रश्न उपस्थित केला. शासनाने किंवा बाजार समितीने फळे पिकविण्यासाठी व्यापाऱ्यांना रॅपिंग चेंबर्सची सोय उपलबध करून दिल्यास सोईचे होईल असे म्हणणे मांडले.