अपक्षाच्या भूमिकेला किनवटमध्ये महत्त्व
जिल्ह्य़ाच्या किनवट नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी सर्वाधिक ८ जागा पटकावल्या, तरी त्यांना बहुमत मिळाले नाही. काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी ४ जागा मिळाल्या. एका अपक्षाचा विजय झाला. या पाश्र्वभूमीवर पालिकेची सत्तासूत्रे कोणाकडे, याची उत्सुकता वाढली आहे.
किनवट पालिकेसाठी राष्ट्रवादी, काँग्रेससह शिवसेनेनेही प्रतिष्ठा पणाला लावली होती. निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचे माजी खासदार डी. बी. पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने किनवटमध्ये या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असे मानले जात होते. मतदारांनी या पक्षाच्या पारडय़ात ८ जागा टाकल्या. बहुमताला ९ सदस्यांची गरज असल्याने काँग्रेसच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी नगरपालिकेत सत्ता स्थापन करू शकते.
काँग्रेसने या निवडणुकीत तन-मन-धनाने उडी घेतली होती. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी किनवटमध्ये जाहीर सभा घेऊन बहुमत देण्याचे आवाहन केले होते, पण काँग्रेसला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी या निवडणुकीवर विशेष लक्ष ठेवून होते. पण त्यांना चमत्कार घडवता आला नाही. निवडणुकीत ८ माजी नगराध्यक्ष होते, यातील ६जणांना पराभव पत्करावा लागला.
नांदेडमध्ये ११ जागा पटकावल्यानंतर किनवट पालिकेत मोठा गाजावाजा करून निवडणूक रिंगणात उतरलेल्या एमआयएमसह भाजपा, मनसे, माकपा-भाकपा, भारिप बहुजन महासंघ, शहर विकास आघाडी, संविधान पार्टी यांची डाळ शिजली नाही. प्रभाग एकमधून इस्तारी माडपेल्लीवार, इंदुताई शत्रुघ्न कनाके, शबाना साजित बडगुजर (राष्ट्रवादी), रमा यादवराव नेम्मानीवार (अपक्ष), प्रभाग चारमधून करुणा आळणे (राष्ट्रवादी), माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार (काँग्रेस), गजानन बोलचेट्टीवार, देवम्माबाई श्रीमनवार (राष्ट्रवादी), प्रभाग तीनमधून विद्यमान नगराध्यक्ष सुनील पाटील, सुरज सातूरवार, पुष्पा मच्छेवार, प्रियंका तुलवाड (शिवसेना), प्रभाग चारमधून अंजली दोनपेल्लीवार (काँग्रेस), साजीद खान निसार खान (राष्ट्रवादी), अभय महाजन (काँग्रेस), प्रियंका प्रवीण राठोड (राष्ट्रवादी) व अनाफा बेगम अली (काँग्रेस) यांनी विजय मिळविला. शिवसेना-काँग्रेस एकत्र आले तर सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात द्याव्यात हे अपक्ष उमेदवार रमा नेम्मानीवार यांच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे.