नवीन पिढी जात-पात मानत नाही व तिला भ्रष्टाचाराची चीड आहे. या पिढीसमोर जातिवादाचा अंत करणारा मानवतावादी, लोकशाही प्रस्थापित करणारा राजकीय, सामाजिक दृष्टिकोन देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
बहुजन अधिकारी, कर्मचारी महासंघाच्या राज्यव्यापी अधिवेशनात आंबेडकर बोलत होते. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष एस. आर. भोसले, संघटक गौतम सोनवणे, प्रा. श्रीकांत कांबळे, उत्तम गायकवाड आदी उपस्थित होते. बाबासाहेबांनी आंबेडकरी जनतेला बौद्धिकदृष्टय़ा सक्षम करण्याचा विविध मार्गानी प्रयत्न केला. मात्र, आजही ९० टक्के आंबेडकरी जनता बौद्धिकदृष्टय़ा कमकुवत आहे. तो कोणाच्या तरी पाठीमागे लागतो आहे. स्वत: विचार करीत नाही. इतरांच्या सांगण्यावरूनच काम करतो. आंबेडकरी जनतेने प्रतिक्रियावादी होण्याऐवजी आता क्रियावादी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
जुन्या पिढीतील आंबेडकरी माणूस भावनिकदृष्टय़ा आंबेडकरांशी जोडला गेला होता. नव्या पिढीतील आंबेडकरवादी आता भावनेबरोबरच विचाराने उभा राहात आहे. त्याला दिशा देण्याची गरज आहे. महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचलित धर्म नाकारला.
‘पवार, आठवले
धार्मिक विवंचनेत’
शरद पवार व रामदास आठवले हे दोघेही सध्या धार्मिक विवंचनेत असल्याची टीका आंबेडकर यांनी केली. जनलोकपाल घटनाबाहय़ असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला.