जैवविविधता संरक्षण व संवर्धनात ग्रामीण भाग आघाडीवर असल्याचे मान्य करून वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी बेटांवरील जैवविविधता संरक्षणाची मोहीम व्यापक करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळातर्फे हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आंतरराष्ट्रीय जैवविविधता परिषदेकडून २२ मे रोजी ‘बेटांवरील जैवविविधता’ ही संकल्पना साकार केली आहे. बेट व सभोवतालच्या समुद्र किनाऱ्यालगतचे पर्यावरण हे विशेष असून त्यातील प्राणी व वनस्पती इतरत्र आढळून येत नाही. बेटावरील उत्क्रांतीचा इतिहास व पर्यावरण हे जगातील ६०० दशलक्ष लोकसंख्येचे जीवनमान, आर्थिकस्तर तसेच सांस्कृतिक बाबींशी निगडीत आहे. यावेळी कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष डॉ. इरॉच भरुचा, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) एस.डब्ल्यू.एच. नकवी, प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) सर्जन भगत, विभागीय आयुक्त अनुपकुमार, मंडळाचे सदस्य सचिव दिलीप सिंह, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ए.के. निगम उपस्थित होते.
देशातील सागरी संपत्तीचा लोकसंख्या वाढ व प्रदूषणामुळे वेगाने ऱ्हास होत होऊन मूळ प्रजाती नष्टप्राय होत आहेत. याकरिता एस.डब्ल्यू.एच. नकवी यांनी जैवविविधतेच्या संरक्षणासाठी उपाययोजना सुचवून, या क्षेत्राचे कार्य विस्तृत करण्याच्या सूचना दिल्या. गोंदिया, भंडारा या जिल्ह्यातील जुन्या मालगुजारी तलावांमध्ये स्थानिक मत्स्यबीज टाकून मत्स्य संवर्धन करावे, ज्यामुळे तेथील पशुपक्ष्यांना तेथेच खाद्य मिळेल. यातून जैवविविधतेची शृंखला पुनर्जिवीत होईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले.
हवामान बदल व तापमान वाढीचा विपरित परिणाम सर्वप्रथम बेटांवरील पर्यावरणावर होतो. त्यामुळे
जैविक संसाधनाचा शाश्वत वापर, सामूहिक संवर्धन क्षेत्र, बेटांवरील जैवविविधता तसेच अंदमान-निकोबार बेटावरील हवामान बदल, तापमान वाढ, समुद्र किनाऱ्यालगतचे पर्यावरण आदी महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रवीण परदेशी यांच्या हस्ते जैवविविधता मंडळाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. सागरी जीवशास्त्रज्ञ डॉ. सारंग कुळकर्णी यांनी अंदमान व निकोबार बेट तसेच महाराष्ट्रातील बेटांवरील विविधांगी जैवविविधतेची माहिती दर्शविणारी ध्वनीचित्रफित यावेळी दाखवण्यात आली. आत्मा मंडळाने प्रकाशित केलेले महाराष्ट्रातील धोकाग्रस्त पक्षी या पुस्तकाचे, तसेच पर्यायी वनीकरण कामे, गांजा किटक शेतकऱ्यांचा मित्र, कोळयांचे विश्व, वन्यजीव व्यवस्थापन, आपली जैवविविधता-आपली संपत्ती आदी घडीपत्रिकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निवडक ग्रामपंचायतस्तरीय जैवविविधता समित्यांद्वारे तयार करण्यात आलेल्या समिती धनादेशाचे वाटप करण्यात आले.