मुंबईच्या गोदीमधील जहाजाला लागलेली आग विझविताना प्राणाची आहुती देणाऱ्या ४४ जवानांना, तसेच कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडणाऱ्या अग्निशमन जवानांना दरवर्षी १४ एप्रिल रोजी श्रद्धांजली वाहिली जाते. पण प्राणाची बाजी लावून मुंबईकरांच्या मदतीला धावणाऱ्या जवानांना वरिष्ठांच्या निष्काळजीपणामुळे प्राण गमवावे लागतात. याकडे पालिका आयुक्तांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न एक महिला करीत आहे. केवळ १४ एप्रिलला श्रद्धांजली वाहून मोकळे होण्यापेक्षा नियमांना तिलांजली देणाऱ्या, तसेच अग्निशामकांचे प्राण पणाला लावणाऱ्या निष्काळजी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या महिलेने केली आहे.इमारत कोसळताच अथवा आग लागल्याची वर्दी मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ मदतकार्य सुरू करतात. पावसाळ्यात तर त्यांना कायम सज्ज राहावे लागते. अनेक वेळा केंद्र अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीतही जवान मदतकार्यासाठी धाव घेत असतात. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे, तसेच नियम धाब्यावर बसवले गेल्यामुळे छोटेमोठे अपघात घडतात आणि त्यात अग्निशमन जवानांना प्राणास मुकावे लागते किंवा जायबंदी व्हावे लागते. घटनास्थळी उपस्थित नसलेले वरिष्ठ अधिकारी अग्निशमन केंद्रातील रेकॉर्ड पुस्तकातील नोंदींमध्ये खाडाखोड करणे, वेळप्रसंगी पाने फाडून टाकणे, घटनेशी संबंधित अन्य कर्मचाऱ्यांना खोटी साक्ष देण्यास भाग पाडणे असे अनेक प्रकार करीत असतात. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दहशतीमुळे त्यास वाचा फोडण्यासाठी कुणीही पुढे येत नाही, असा आरोप ‘अभय अभियान ट्रस्ट’च्या कविता सांगरूळकर यांनी केला आहे.कोणत्याही नियमांचे पालन न करता, तसेच सुरक्षिततेचे निकष धाब्यावर बसवून जवानांना धोका पत्करायला लावणारे अधिकारी १४ एप्रिल रोजी श्रद्धांजली सभेत पालिकेतील वरिष्ठांना पिंगा घालत त्यांची मर्जी संपादन करतात. अनेक दुर्घटनांचे चुकीचे, खोटे अहवाल सादर करून आपला बचाव करण्यात हे अधिकारी गुंतल्याचा आरोपही सांगरूळकर यांनी केला आहे.पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी १४ एप्रिल रोजी बलिदान देणाऱ्या जवानांना जरूर श्रद्धांजली अर्पण करावी. पण मुंबईकरांसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या अग्निशामकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत. तीच खरी बलिदान देणाऱ्या जवानांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन सांगरूळकर यांनी केले आहे.