राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गेल्या पाच विधिसभांपैकी अशी एकही विधिसभा झाली नाही की ज्यात महाराष्ट्र ज्ञान मंडळाचा (एमकेसीएल) विषय पेटला नाही. या विषयाच्या अनुषंगाने सतत विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला गेला. मात्र, शुक्रवारी पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे यांनी सर्वकाही आलबेल असल्याचे सांगत वाद संपुष्टात आल्याचे संकेत दिले. एक महिन्यापूर्वी झालेल्या विधिसभेत विद्यापीठ प्रशासनाला एमकेसीएलची सेवा असक्षम वाटत होती. मात्र आता एमकेसीएलला स्वच्छतेची पावती देऊन त्यांचीच सेवा स्वीकारणार असल्याचे सुतोवाच करीत कुलगुरूंनी एक नवीन अध्याय सुरू करणार असल्याची माहिती देऊन आश्चर्याचा धक्का दिला. एमकेसीएलने विद्यापीठाशी २००७मध्ये करार करून २००९पासून सेवा देणे सुरू केले. दरवर्षी प्रथमवर्ष, द्वितीय वर्ष आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ई-सुविधेच्या अंतर्गत ५० रुपये घेतले जायचे. सुमारे आठ वर्षांपासून हे शुल्क घेतले जात असून दरवर्षी प्रथम, द्वितीय वर्षांचे सुमारे दीड लाख विद्यार्थी प्रवेश घेतात. करारानुसार सेवा न दिल्याने विद्यापीठाने वेळोवेळी नमूद केले आहे. एमकेसीएलकडून दिल्या जाणाऱ्या ई-सुविधेच्या नावाखाली विद्यापीठाकडे २००६-०७ ला २३ लाख जमा झाले होते. २००७-०८मध्ये ८२लाख २६ हजार, २००८-०९मध्ये ९४ लाख २२ हजार आणि २००९-१०मध्ये ४३ लाख जमा झाले होते. असे आठ वर्षांमध्ये विद्यार्थ्यांकडून सात ते आठ कोटींचा निधी विद्यापीठात जमा असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. तसेच माहिती सेवेत एकूण ११ सेवांचा समावेश होता. त्यात वेब पोर्टल, संपूर्ण माहिती टाकणे, अधिकाऱ्यांच्या माहितीसह हे पोर्टल बनवायचे होते. त्यानंतर सात सेवा या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंबंधी होत्या. प्रशासनासंबंधी सेवेंतर्गत १४ सेवा देणे अपेक्षित होते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून ते पदवी बाहेर पडेपर्यंतच्या सेवा होत्या. याशिवाय काही सेवा संलग्नित महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना द्यायच्या होत्या. त्यात ऑनलाईन प्रमाणपत्र देण्याचाही समावेश होता. मात्र, एमकेसीएलतर्फे दिली जाणारी सेवा असक्षम वाटत असल्याने प्रशासनाच्यावतीने त्यांची देयके थांबवून ठेवली होती. असा आजपर्यंतचा या वादाचा इतिहास आहे. त्यामुळेच एमकेसीएलची सेवा विद्यापीठाने बंद केली होती आणि विद्यार्थ्यांकडून घेतलेला ७ कोटींचा निधी विद्यापीठात पडून असल्याचेही सांगितले होते. एमकेसीएलला आतापर्यंत कोणतेच देयक दिलेले नाहीत आणि ईसुविधेच्या रूपाने घेतलेला पैसा विद्यापीठाकडे सुरक्षित आहे. कायदेशीर नोटीस बजावली नसून त्यांनी कामांचे किती पैसे झाले यावर प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात होती, असा आतापर्यंतचा याविषयासंबंधीचा घटनाक्रम आहे. यावर तोडगा काढण्यात आला असून तडजोड करण्यात येऊन एमकेसीएलने केलेल्या कामाचे पैसे दिले जातील, तसेच विद्यार्थ्यांचा पैसाही सुरक्षित असल्याचा निर्वाळा त्यांनी यावेळी देत आता नवीन अध्यायाची सुरुवात करणार असल्याचे स्पष्ट केले.