साध्या बसमधील प्रवासासाठी दोन ते चार, तर वातानुकूलित बसच्या भाडय़ात दहा रुपयांची भाडेवाढ प्रस्तावित

डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या किमतींमुळे जमा-खर्चाचे गणित जमविताना नाकीनऊ आलेल्या नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने (एनएमएमटी) वर्षभरातच प्रवासी भाडय़ातील वाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. येत्या शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत यासंबंधीचा प्रस्ताव मांडण्यात येणार असून यानुसार साध्या बसमधील प्रवासासाठी दोन ते चार, तर वातानुकूलित बसच्या भाडय़ात पाच रुपयांपासून तब्बल दहा रुपयांची भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याकाठी उपक्रमाला सुमारे दीड कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असून यामुळे या भाडेवाढीशिवाय पर्याय नाही, असा दावा परिवहन व्यवस्थापनाने केला आहे.
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाकडे सुमारे ३४० बसेसचा ताफा आहे. यामध्ये १४५ बसेस डिझेलवर, तर १६१ बसेस सीएनजीवर धावतात. यामध्ये ३० वातानुकूलित बसेसचाही समावेश आहे. एनएमएमटीमार्फत तब्बल ४० मार्गावर बससेवा पुरविण्यात येते. यामध्ये वांद्रे, मंत्रालय, दादर, मुलुंड, ठाणे, भाईंदर, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, खारघर, उरण, खोपोली अशा महापालिका हद्दीबाहेर असणाऱ्या मार्गाचाही समावेश आहे. सातत्याने वाढणाऱ्या इंधनाच्या दरांमुळे एनएमएमटीने फेब्रुवारी २०१२ तिकीट भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर केला. राज्याच्या परिवहन विभागाने त्यास सप्टेंबर २०१२ मध्ये मंजुरी दिली आणि भाडेवाढ लागू झाली. ही भाडेवाढ लागू झाली तेव्हा डिझेलचे दर प्रति लिटरमागे ४४ रुपये २९ पैसे तर सीएनजीचे दर प्रति किलोमागे ३३ रुपये ४१ पैसे असे होते. केंद्र सरकारने दरम्यानच्या काळात डिझेलच्या दरांवरील नियंत्रण काढून घेतल्याने तेल कंपन्यांना हे दर ठरविण्याचा अधिकार प्राप्त झाला. या वर्षभरात डिझेलचे दर नवी मुंबईत ६१ रुपये २१ पैसे इतके झाले असून परिवहन उपक्रमास हेच डिझेल ६९ रुपये २८ पैसे प्रति लिटर या दराने विकत घ्यावे लागते. या काळात डिझेलच्या दरांमध्ये तब्बल २४ रुपये, तर सीएनजीचे दर प्रति किलोमागे सहा रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे एनएमएमटीच्या तोटय़ात मोठी वाढ झाली असून प्रत्येत महिन्याला सुमारे एक कोटी ७४ लाख रुपयांचा तोटा उपक्रमाला सहन करावा लागत आहे. एनएमएमटीचा सामायिक खर्च सुमारे नऊ कोटी ३८ लाख इतका असून उत्पन्न सात कोटी ६४ लाख इतके आहे. हे प्रमाण पाहता प्रति किलोमीटर आठ रुपये इतका तोटा प्रत्येक बसमागे सहन करावा लागत आहे, अशी माहिती परिवहन उपक्रमाचे सभापती इक्बाल शेख यांनी वृत्तान्तला दिली. बेस्ट उपक्रमाशी तुलना केली असता एनएमएमटीचे सध्याचे तिकीट दर १३ टक्क्यांनी कमी आहेत. वाढलेला खर्च लक्षात घेऊन उत्पन्न वाढीचे प्रयत्न केले जात आहेत. तरीही तोटा वाढत चालल्याने भाडेवाढीचा सुधारित प्रस्ताव येत्या १७ ऑक्टोबर रोजी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे, असे इक्बाल यांनी सांगितले. सुधारित प्रस्तावानुसार सर्वसाधारण बसेससाठी दोन ते चार रुपयांची वाढ सुचविण्यात आली असून वातानुकूलित बसेससाठी ही वाढ पाच ते दहा रुपयांपर्यंत प्रस्तावित करण्यात आली आहे.