मुलांच्या शैक्षणिक, मानसिक विकासाला प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या अधिकारांच्या संरक्षणाची हमी देणाऱ्या चाईल्ड लाईनचा भंडाऱ्यात अभाव असून मुलांना व्यक्त होण्याचा दुसरा पर्याय नसल्याने त्यांच्यासोबत होत असलेल्या र्दुव्‍यवहाराबाबत ते कुणाकडे बोलते होत नाहीत.
भंडाऱ्यापासून २० किलोमीटरवर असलेल्या मुरमाडी गावातील तीन बहिणींवर बलात्कार करून त्यांचे हत्याकांड घडवून आणणारे नराधम अजूनही पोलिसांना गवसले नाहीत. या हत्याकांडानंतर मिडिया, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संघटनांनी संबंधित गावाला भेट देऊन त्या ठिकाणची विविधांगी माहिती गोळा करून हत्याकांडातील आरोपी गवसले पाहिजेत, असी भूमिका वेळोवेळी जाहीर केली. वाईट बाब म्हणजे भीषण घटना घडूनही विद्यार्थिनींवर शिक्षकांमार्फत अत्याचाराच्या घटनांनी भंडारा जिल्हा कलंकित झाला आहे. मुरमाडीत एवढा भयंकर प्रकार  पालांदूरच्या घटनेत एका शिक्षकाने १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला तर मंगळवारी, २६ फेब्रुवारीला बागडे नावाच्या शिक्षकाने नऊ मुलींचा विनयभंग केल्याची प्रकरण उघडकीस आले आहे.
घटनांचे गांभीर्य पाहता शाळकरी मुली बोलू लागल्याचे निदर्शनास येते. इतके दिवस अज्ञानापोटी म्हणा किंवा भीतीपोटी चूप बसलेल्या मुलींनी अबोलपणा सोडून त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. यासंदर्भात मातृसेवा संघ समाजकार्य संस्थेचे प्राचार्य डॉ. जॉन मेनाचेरी यांनीही मुरमाडीतील त्या तीन मुलींची आई माधुरी बोरकरांची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली. गेल्या १५ वर्षांपासून नागपूर चाईल्ड लाईन १०९८ अंतर्गत मुलांच्या विकासाला चालना देत त्यांच्यावरील अन्याय-अत्याचाराचे निराकरण करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. या चाईल्ड लाईनचा हवाला देत डॉ. मेनचेरी यांनी भंडाऱ्यात पोलिसांची चाईल्डलाईन सोडता इतर संस्थांची चाईल्ड लाईन नसल्याचे सांगितले.  अनेकदा लोकांना पोलिसांना माहिती द्यावीशी वाटत नाही. मुले, शिक्षक, पालकांशीही एखाद्या विषयावर बोलत नाही. कदाचित त्यांच्यावर अविश्वास दाखवला जाण्याची कल्पना त्यांना आलेली असते. त्यामुळे तिऱ्हाईताकडून आपल्याला मिळू शकेल. ते आपल्याला समजून घेऊ शकतील किंवा मार्ग दाखवतील, असा विश्वास त्यांना वाटतो. त्यामुळे मुले चाईल्डलाईनची मदत घेतात. नागपुरात गेल्या १५ वर्षांपासून चाईल्डलाईन आहे. देशात मुंबई, दिल्ली पाठोपाठ नागपुरात चाईल्डलाईन आली. त्याआधारे मुलांचे अनेक प्रश्न सोडवले गेले आणि आताही सोडवले जात आहेत. मुलांच्या विकासाला उपयोगी पडेल आणि जीवनाला चालना देण्यासाठी चाईल्डलाईनचा उपयोग मुलांना चांगला होतो. विदर्भात नागपूरसह, वर्धा, अमरावती आदी जिल्ह्य़ांमध्ये चाईल्डलाईन आहे. तशीच ती भंडाऱ्यात असणेही आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्वच पातळ्यांवर चाईल्डलाईनसाठी प्रयत्न गरजेचे असल्याचे डॉ. जॉन मेनाचेरी ‘लोकसत्ता’शी बोलताना
सांगितले.