केंद्र सरकारच्या जेएनआरयूएम आणि राज्य सरकारच्या एमएमआरडीए या दोन प्राधिकरणांच्या संभाव्य आर्थिक मदतीवर दरवर्षी फुगविण्यात येणारा नवी मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प या वर्षी मात्र वस्तुनिष्ठ आणि वास्तवदर्शी राहणार असल्याची ग्वाही पालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी ‘महामुंबई वृत्तान्त’शी बोलताना दिली. मालमत्ता आणि पाणीपट्टीमध्ये कोणतीही वाढ नसल्याचा आणि एलबीटीमध्ये ४० टक्के कपात केल्याने यंदाचा अर्थसंकल्प अडीच हजार कोटी रुपये जमेचा न होता ते दीड हजार कोटी रुपये जमेचा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प नवी मुंबईकरांना दिलासा देणारा ठरणार आहे.
नवी मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात सादर केला जात असतो. जेएनएनआरयूएममधून मिळणारे ५२ कोटी आणि एमएमआरडीएकडून मिळणारे २२५ कोटी यामुळे पालिकेचा अर्थसंकल्प दरवर्षी अडीच हजार कोटीचा पल्ला गाठत होता. या वर्षी जेएनएनआरयूएमच्या माध्यमातून होणारे पाणी पुरवठा, मलनि:सारण वाहिन्या टाकण्याचे काम संपल्याने जेएनएनआरयूएमच्या वतीने मिळणारे अनुदान मिळणार नाही. त्याचप्रमाणे एमएमआरडीएने एमआयडीसीतील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मान्य केलेले ७५० कोटी रुपये अद्याप मिळाले नसल्याने ते प्रत्यक्षात मिळाल्यानंतरच अर्थसंकल्पात त्यांचा उल्लेख केला जाणार आहे. एलबीटीचा सरकारने सुचवेलेला कर कमी करून त्यात कपात करण्यात आल्याने पालिकेला या वर्षी १५० कोटी रुपये कमी महसूल मिळणार आहे. त्यात पिंट्र मीडियाच्या कागदावर एलबीटी माफ केल्याने पालिकेला कमी कर मिळणार आहे. त्यामुळे उपकर, मालमत्ता कर, पाणीपट्टी, नगररचना विभाग आणि काही शासकीय अनुदान यामुळे पालिकेचा अर्थसंकल्प वस्तुनिष्ठ व वास्तवदर्शी होणार आहे. या जमेच्या बाजूकडून एक हजार ५०० कोटी जमा झाल्यास तेवढाच खर्च पायाभूत सुविधांवर करण्यात येणार आहे. यात सिडकोकडून सार्वजनिक हितासाठी भूखंड ताब्यात घेऊन त्याचा विकास करणे, निवारा शेड उभारणे, अग्निशमन विभागाचे सक्षमीकरण, आप्तकालीन विभागाला चालना अशा कामांना प्राधान्य दिले जाणार असून पालिकेचा मालमत्ता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. उच्च दाबाच्या वाहिन्याखालील जमीन ताब्यात घेऊन त्या ठिकाणी हरित पट्टे तयार करण्याचे काम पालिका या वर्षी करणार आहे. पािलका आयुक्त जऱ्हाड शुक्रवारी १४ फेब्रुवारीला स्थायी समितीत हा अर्थसंकल्प सादर करणार असून त्यानंतर सदस्य त्यावर विचारविनिमय करून वाढ सुचविण्याची शक्यता आहे. जुन्या मुख्यालयात सादर झालेल्या या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी मात्र नवीन इमारतीत होणार आहे. व्हेलेंटाईन डेच्या दिवशी कोणत्याही प्रकारची दरवाढ न झालेला हा प्रेमाचा अर्थसंकल्प आयुक्त नवी मुंबईकरांना देणार आहेत.