उल्हास नदीतील पाणी साठय़ाच्या नियोजनासाठी कळवा लघु पाटबंधारे विभागाकडून १४ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. परिणामी स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडून ठाणे शहरात होणारा पाणीपुरवठा आता दर मंगळवारी बंद राहणार आहे. मंगळवारी सकाळी ९ ते बुधवार सकाळी ९ या वेळेत बंद राहणार आहे.
मात्र या काळात ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतील पाणीपुरवठा मात्र सुरू राहणार आहे. त्यामुळे इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, समतानगर, गांधीनगर, शास्त्रीनगर, सूरकरपाडा, सिद्धेश्वर, महागिरी, ऋतू पार्क, उथळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपाखाडी, चरई, कळवा, खारेगाव, रेतीबंदर या भागातील पाणीपुरवठा सुरू राहील. मात्र घोडबंदर रोड, बाळकूम, ढोकाळी, पवारनगर, खारटन रोड भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील दोन दिवस ठाणे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.