ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक आणि शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांचा पराभव प्रतिस्पर्धी उमेदवारांनी नव्हे तर मतदारांनी ‘नोटा’ अर्थात नकाराधिकार वापरून केल्याचे निष्पन्न झाले आहे.   
लोकसभेनंतर नकाराधिकार या उमेदवारांव्यतिरिक्तच्या नव्या पर्यायाची माहिती मिळाल्यानंतर ठाणे जिल्ह्य़ातील १८ मतदारसंघांतील ४३ हजार ८५ मतदारांनी या अधिकाराचा पुरेपूर वापर केला. ठाणे जिल्ह्य़ातील एकूण मतदान केलेल्या मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण १.४३ टक्के इतके होते. तुलनेने हे प्रमाण कमी असले तरी नागरिकांमध्ये या पर्यायाविषयी पुरेपूर जागृती झाल्याचे या निवडणुकीतून दिसून आले. एकूण मतदारांच्या तुलनेत हा टक्का अत्यल्प असला तरी आपली नापसंती व्यक्त करण्याची संधी मिळाल्यामुळे अनेकांनी हा पर्याय वापरल्याचे चित्र आहे.
नकाराधिकार वापरणाऱ्यांमध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघाचा प्रथम क्रमांक असून तेथे सर्वाधिक ७ हजार ८३५ नोटा वापरण्यात आले तर भिवंडी पूर्वेत ६१२ आणि भिवंडी पश्चिमेत ७९९ असा सर्वाधिक कमी नकाराधिकार वापरण्यात आला. कल्याण पूर्वमध्ये अपक्ष गणपत गायकवाड हे ७४५ मतांनी विजयी झाले असून या भागात नोटाला मात्र २७२० जणांनी पसंती दिली आहे. त्यामुळे या मतांचा फटका दुसऱ्या क्रमांच्या उमेदवाराला बसल्याची शक्यता आहे तर बेलापूर मतदारसंघामध्ये मंदा म्हात्रे यांचा १४९१ मतांनी विजय झाला तेथे नोटाला मात्र १९४४ जणांनी भरभरून मतदान केले.
पालघरमध्ये १९ हजार ६६१ नोटा..
ठाण्याबरोबर पालघरमध्येही नोटाचा उपयोग मतदारांनी सढळ हस्ते केला असून एकूण १९ हजार ६६१ मतदारांनी नोटाचा पर्याय वापरला. डहाणूमध्ये ४ हजार ४९८, विक्रमगडमध्ये ४ हजार १८८, भोईसरमध्ये ३ हजार १२६, पालघरमध्ये २९८७, वसईमध्ये २ हजार ९६४ तर नालासोपारामध्ये सर्वात कमी १ हजार ८९८ नकारार्थी मते मतदारांनी टाकली. 

कल्याण (प.)       – १८३८

मुरबाड       – ३३९४     

अंबरनाथ     – २२८८     

उल्हासनगर   – १३०८     

कल्याण (पू.)       – २७२०     

डोंबिवली     – २०१३     

कल्याण (ग्रा)       – ७८३५

मिरा-भाइईंदर       – २३७८

ओवळा-माजिवडा     – २३९०

कोपरी-पाचपाखाडी    – २५६५

ठाणे   – २१९४     

मुंब्रा-कळवा   – १६८५     

ऐरोली – १६९७     

बेलापूर       – १९४४

एकूण – ४३,०८६