भंडारदरा धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दि. १०ला आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. पण, आता जायकवाडीत पाणी जाण्याचा वेग कमी झाल्याने आवर्तन आणखी पाच दिवस लांबणार आहे.
या बैठकीत पहिल्या आवर्तनासंबंधीच निर्णय झाला. आमदार भाऊसाहेब
कांबळे व माजी आमदार जयंत ससाणे यांनी तीन आवर्तने होणार
असल्याचे जाहीर केल्याने नाराजी व्यक्त होते.
पहिल्या आवर्तनात २ हजार ५०० ते २ हजार ७०० दशलक्ष घनफूट पाणी लागेल, असा अंदाज आहे. सात क्रमांकाच्या अर्जावर आजपासून पाणी मागणी अर्ज मागविण्यास प्रारंभ झाला आहे. पाणी मागणी जादा झाली तर मात्र आवर्तनाचे नियोजन कोलमडू शकेल व केवळ दोनच आवर्तने होऊ शकतील.
पिण्यासाठी आवर्तने वाढवावी लागतील. आता पहिल्या आवर्तनात किती पाणी लागते यावरच पुढे एक आवर्तन होणार की दोन हे ठरणार आहे. कांबळे व ससाणे त्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब काळे यांनी ससाणे हे कालवा सल्लागार समितीचे सदस्य नसून ते विनाकारण लूडबुड करून लोकांची दिशाभूल करीत आहेत,
अशी टीका केली आहे.