शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘टर्मिनल मार्केट’ची अधिसूचना नुकतीच काढण्यात आली आहे. शंभर एकर जागेत वर्धा मार्गावरील वारंगा येथे टर्मिनल मार्केट उभारण्यात येणार असून त्यासाठी अपेक्षित खर्च ७०० कोटींच्या घरात जाणारा असून काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव व रामटेकचे खासदार मुकुल वासनिक शेतकऱ्यांच्या हिताच्या या प्रकल्पाचा पाठपुरावा करीत आहेत.
मौदा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी मुकुल वासनिक यांनी करून शेतकऱ्यांच्या महसूलविषयक प्रलंबित अडचणी जाणून घेतल्या.
कालव्यासाठी शेतजमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. परंतु, भूमिअभिलेखात या जमिनीची आराजी व तपशील अद्ययावत नोंदणी करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सात-बारा मिळाला नसून अल्प भूधारक या लाभापासून वंचित आहे.
 याशिवाय  सुमारे सव्वा लाख अर्ज शेतजमीन दोनमधून एकमध्ये भोगवट करण्याचे प्रलंबित आहे. खासदार मुकुल वासनिक यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना सुधारित सात-बारा देण्याचे आदेश दिले. तसेच बाळासाहेब थोरात यांनी विषयासंबंधी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यास सांगण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुनीता गावंडे आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी टर्मिनल मार्केटला मंजुरी मिळवून दिल्याबद्दल खासदार मुकुल वासनिक यांचे अभिनंदन केले.