औरंगाबाद-जालना रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम निविदेतील अटीनुसार झाले की नाही, याची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. निविदेतील अटींमधील कामे झाली नसल्याचे आढळल्यास या रस्त्यावर सुरू असलेली दोन ठिकाणची पथकर वसुली ही कामे पूर्ण होईपर्यंत स्थगित करण्यात यावी, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशात म्हटले आहे.
आमदार संतोष सांबरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, औरंगाबाद-जालना त्याचप्रमाणे झाल्टा तसेच बीड वळण रस्त्यांच्या निविदेतील अटींची पूर्तता झाली नसल्याने या मार्गावरील दोन पथकर वसुली नाके बंद करण्याची मागणी आपण केली होती. ९८ टक्के काम पूर्ण झाल्यावरच पथकर वसुली सुरू करावी, अशी अट असतानाही तिचे उल्लंघन झाले. ६५ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यातील ५० टक्के डांबरीकरणाच्या भागाची अवस्था वाईट आहे. इतरही अनेक तक्रारी या रस्त्याबाबत आहेत. त्यामुळे या रस्त्याची आवश्यक कामे पूर्ण होईपर्यंत दोन्ही पथकर वसुली नाके बंद करावी, अशी आपली मागणी आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वरील आदेश काढला आहे.