बलात्कार आणि महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे यांचे सध्या पेवच फुटल्यासारखे वातावरण आहे. ज्या सहजतेने आणि निर्ढावलेपणाने, राजरोसपणे हे गुन्हे होत आहेत ते समाज म्हणून आपल्यासाठी अतिशय चिंतेची बाब आहे. अशा गुन्ह्य़ांसाठी पोलिसांना जबाबदार धरण्याने फार काही साध्य होणार नाही. कारण हे गुन्हे करणाऱ्यांच्या, विशेषत: तरुणांच्या मानसिकतेमध्ये प्रवेश केलेल्या विकृतीमुळे हे गुन्हे घडत आहेत. आई-वडील नोकरीनिमित्त दिवसभर बाहेर, इंटरनेट, मोबाइलसारखे आधुनिक तंत्रज्ञान सहजी हाताशी, सगळीकडे कामुक वातावरण आणि अर्निबध वागणे हे अतिशय स्फोटक मिश्रण आहे. आईवडिलांना अनेकदा आपल्या घरात असे स्फोटक वातावरण असल्याचे जाणवतही नाही. अशा झोपी गेलेल्या आई-वडिलांसाठी..

१९ सप्टेंबर २०११ : मालाडच्या उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या ६७ वर्षीय सरला पटेल यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती, पण सर्वात जास्त धक्का बसला जेव्हा या घटनेचे आरोपी पकडले गेले तेव्हा. सरलाबेन यांची हत्या त्यांच्याच १७ वर्षीय नातवाने केली होती. पटेल यांचा नातू कुणाल (नाव बदललेले) याला पब आणि हुक्का पार्लरमध्ये जायचा नाद लागला होता. एकदा हुक्का पार्लरमध्ये जाण्यासाठी त्याला पैसे कमी पडले. तेव्हा त्याने आपल्याच घरात चोरी करण्याची योजना बनविली. त्याचे वडील व्यावसायिक होते. घरात खूप परदेशी चलन आणि सोने असते, हे त्याला माहीत होते. त्यामुळे त्याने मित्राच्या मदतीने घरातच चोरी करण्याची योजना आखली. चोरी करत असताना त्याला घरात एकटय़ा असलेल्या सरलाबेन यांनी विरोध केला. संतापलेल्या कुणालने, ती आपली आजी आहे, याचा कसलाही विचार न करता सरळ गळा दाबून तिला मारून टाकले आणि त्यानंतर घरातून युरो, डॉलरसह ३० तोळे सोने लंपास केले.
११ सप्टेंबर २०१२ : १५ वर्षांच्या सुमीतला (नाव बदललेले) हेलिकॉप्टरचे मॉडेल बनविण्याचा छंद होता. बघता बघता हा छंद वाढत गेला. वास्तविक या वयात हेलिकॉप्टरचे मॉडेल बनवण्यात त्याने चांगलेच प्रावीण्य मिळविले होते, पण त्याच्या छंदाला घरातून प्रोत्साहन मिळाले नाही. आपला छंद पुरा करण्यासाठी तो घरातून पैसे चोरू लागला. पण आपली चोरी पकडली जाईल, या भीतीने चोरलेले पैसे पुन्हा बँकेत ठेवण्याचे त्याने ठरविले. पण यासाठी त्याने योजना आखली ती मात्र अघोरी होती. त्याने स्वत:च्याच चुलत भावाचे अपहरण करण्याचे ठरविले. शेजारीच राहणाऱ्या ८ वर्षांच्या धीरज पंडितचे त्याने अपहरण केले. तेव्हा धीरजने आरडाओरड केला. तेव्हा मग संतापलेल्या (की घाबरलेल्या) सुमीतने त्याची गळा दाबून हत्या केली.
ऑगस्ट २०१२ : व्ही. पी. रोड पोलिसांनी महागडय़ा मोटारसायकली चोरणारी तरुण मुलांची एक टोळी पकडली. त्यांच्याकडून चोरीच्या महागडय़ा गाडय़ा जप्त केल्या. ही सर्व मुले १७ ते २० वर्षे वयोगटातली होती. मैत्रिणींना महागडय़ा गाडय़ांवरून फिरविण्याचा त्यांना छंद होता. त्यामुळे अशा मोटारसायकली चोरण्याची त्यांना सवय लागली. ही सर्व मुले मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातली होती, तर यातील मुख्य आरोपी एका पोलीस हवालदाराचा मुलगा होता. मे २००९ : अल्पवयीन तरुणींशी मैत्री करून त्यांच्यावर बलात्कार करणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाला चारकोप पोलिसांनी अटक केली. प्रीतेश सोनी हा तरुण अमेरिकेहून परतला होता. चांगल्या घरातील एकुलता एक मुलगा. पण त्याच्या मनात विकृती निर्माण झाली होती. भारदस्त व्यक्तिमत्त्व, पाश्चात्त्य उच्चारांचे प्रभावी इंग्रजी यामुळे तो शाळकरी मुलींवर इम्प्रेशन मारू शकत असे. त्यांच्याशी मैत्री करून, विश्वास संपादन करून तो त्यांना लॉजवर घेऊन जाई आणि तेथे त्यांच्यावर बलात्कार करीत असे. एका प्रसिद्ध अभिनेत्याची १३ वर्षीय मुलगीसुद्धा त्याची शिकार झाली होती. मुलांमध्ये चंगळवाद वाढीस लागला आहे. तो पुरा करण्यासाठी त्यांना पैसा कमी पडतो. त्यामुळे ते चोरीसारख्या गुन्ह्यांकडे वळत असल्याचे गुन्हे शाखेच्या युनिट ८ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ दळवी यांनी सांगितले. मुलांचा घरातील संवाद कमी होत आहे. सरला पटेल यांची हत्या करणारा नातू गडगंज श्रीमंत घरातील होता, पण घरात संवादाचा अभाव, संस्कारांचा अभाव असल्यामुळे त्याने हे कृत्य केले, असे दळवी यांचे म्हणणे आहे. केवळ मैत्रिणींना इम्प्रेस करण्यासाठी मोटारसायकली चोरणारी मुलेही चांगल्या, सुशिक्षित घरातली होती. आपण श्रीमंत घरातील आहोत आणि नेहमी नवनवीन गाडय़ा घेत असतो हे त्यांना मैत्रिणींना दाखवून द्यायचे होते. त्यामुळे मोटारसायकली चोरण्याची सवय त्यांना लागली, असे निरीक्षण व्ही. पी. रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजू सुर्वे यांनी नोंदविले.
आजकालच्या तथाकथित खुल्या, मोकळ्या वातावरणामुळे मुले चंगळवादी बनत चालली आहेत. त्यांना चांगल्या-वाईटाचे भान राहात नाही. अशा वेळी पालकांनी त्यांच्याशी सुसंवाद साधला तर या मुलांच्या गुन्हेगारीला आळा घातला येऊ शकेल.