आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंब आनंदी असते. जीवन अमूल्य आहे. तेव्हा आपल्या आरोग्याची काळजी घ्या. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे. गरजू रुग्णांना मदतीचा हात द्या, असा सल्ला विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब भोगे यांनी दिला. डिगडोह येथील एन.के.पी. साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर रुग्णालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त आरोग्याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आरोग्य यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा नागपूर, अमरावती जिल्ह्य़ासह मध्यप्रदेशातील ५०० गावांना भेटी देणार आहे. डॉ. भोगे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या यात्रेत १५० डॉक्टर्स, परिचारिका, सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवकांचा सहभाग असून ते लोकांशी संवाद साधत आहेत. दहा दिवसीय यात्रेच्या चौथ्या दिवशी कन्हान, कामठी, बोरगाव, आदासा, धापेवाडा, मांडवी, मोहपा, मडासावंगी, तीनखेडा, पिपळा, खुमारी, तेलकामठी, सावनेर, मार्गाने हेटीसुर्ला येथे मुक्कामास थांबली. मार्गात येणाऱ्या प्रत्येक गावांत आरोग्यरथ, पथनाटय़, िदडी व इतर माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला जात आहे. महाविद्यालय व रुग्णालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त ‘आकस्मिक वैद्यकीय सेवा’ याला प्राधान्य दिले जात आहे. ग्रामीण भागातील जनता अत्याधुनिक वैद्यकीय सेवेपासून वंचित आहेत तसेच ग्रामीण रुग्णांना खासगी व महागडय़ा वैद्यकीय उपचारासाठी शहरात धाव घ्यावी लागते. ८० टक्के आकस्मिक दुर्घटना आपल्या घरातच घडतात. अशा दुर्घटना झाल्यास त्या हाताळण्यासाठी जीवनात मदतीचे मूलभूत उपाय शिकणे आवश्यक आहे. गरजू रुग्णांना आकस्मिक वैद्यकीय सेवा मिळावी, या सामाजिक संकल्पनेतून संस्थेचे सचिव डॉ. अमोल देशमुख यांनी ग्रामीण भागात जनजागृतीसाठी १० दिवसीय आरोग्य यात्रा काढण्याचे ठरवले आहे. रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त रुग्णांना सवलतीच्या दरात अत्याधुनिक सेवा देण्याचा रुग्णालय प्रशासनाचा प्रयत्न आहे.