गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य अतिशय शिस्तबद्ध असते. मानवता मंदिर ते तरुण पिढीला प्रेरणादायी ठरते. यामुळे तुकडोजी महाराजांचे तत्त्वज्ञान हे जनसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. महाराजांच्या वाङ्मयाचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत अनेक उपक्रम स्वयंस्फूर्तीने राबवण्यात येत आहेत. महाराजांची जयंती व पुण्यतिथी शासनातर्फे साजरी करण्यासाठी शासनदरबारी आग्रह धरू, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी केले.
गुरुवारी बाभुळगाव येथील मानवता मंदिर लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. मानवता मंदिराचे उद्घाटन राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. उद्धवराव गाडेकर, गुरुकुंज मोझरी आश्रमाचे सरचिटणीस गुलाबराव खवसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल, पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, जिल्हा परिषद सदस्य अमन गावंडे, डॉ. रमेश महानुर, डॉ. वाल्मिक चौधरी, मनोहर बुरेवार, विनायक शेळके, आधार फाऊंडेशनचे राजू पडगिलवार, ज्ञानेश्वर जुनघरे, सतीश मानलवार, सुरेश बोथरा, केमेकर महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
ते म्हणाले की, महाराजांच्या विचारसरणीच्या आधारे जिल्हा परिषदेत अनेक चांगले निर्णय घेता आले आहेत. त्यांचाच विचारांच्या प्रभावाने महाराष्ट्र शासनही कार्य करत असून गुरुदेव सेवा मंडळाला त्यांच्या समाजोपयोगी उपक्रमात जिल्हा परिषद सदैव साथ देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या आधी ग्रामजयंती महोत्सवाचे उद्घाटन रामधन महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी आयोजित युवा मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य नीळकंठ हळदे, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी तहसीलदार ज्ञानदेव गोरडे, जिल्हा सेवाधिकारी माणिक टोंगे, गटशिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, सरपंच मारोतराव गाजलेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष डॉ. रिखबचंद तातेड, मनोहर बुरेवार, गणोरीच्या सरपंच नलिनी घोडमारे, खुशाल ठाकरे उपस्थित होते. ग्रामजयंती महोत्सवासाठी प्रा. अशोक कोठारी, भोजराज अंगुड्डे, प्रा. देवेंद्र आत्राम, राजू खडसे आदींनी सहकार्य केले.