रेणुका देवीची आंबिल यात्रा शनिवारी येथे पारंपरिक व उत्साही वातावरणात पार पडली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. डिजिटल फलकमुक्त यात्रा हे यावर्षीचे वेगळेपण ठरले. कोल्हापूर शहर व परिसरातून कर्नाटकातील सौंदती येथे भरणाऱ्या रेणुका यात्रेसाठी हजारो भक्तगण जात असतात. येथील यात्रा संपल्यानंतर शहरातील जवाहरनगर येथील रेणुका देवीच्या मंदिरात यात्रा भरते. रेणुका देवीच्या पुरातन मंदिरात भरणाऱ्या या यात्रेत आंबिल यात्रा म्हणून ओळखली जाते. देवीच्या दर्शनासाठी येणारे भक्तगण सोबत आंबिल घेऊन येतात. देवीच्या दर्शनाबरोबरच आंबिल प्रसाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते. आजच्या यात्रेवेळी हेच पारंपरिक चित्र दिसून आले. मंदिराच्या परिसरात विविध प्रकारची खेळणी, खाद्य पदार्थ व प्रसादाचे स्टॉल उभारण्यात आले होते. त्याचा आस्वाद घेण्यास भाविक दंग झाले होते. दरवर्षी यात्रा काळात मंदिर परिसर व जवाहर नगरात डिजिटल फलकाचे युध्दच उभे राहिल्याचे दिसत होते. यावर्षी मात्र ही पध्दत बऱ्याच प्रमाणात मोडून काढण्यात आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा फलक वगळता अन्य फलक गायब झाल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. यात्रा परिसरात गोंधळ होऊ नये,यासाठी चांगला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.