‘सर्वासाठी आरोग्यसेवेची व्यवस्था’ निर्माण करणे मोठे, गुंतागुंतीचे आणि बहुआयामी काम असले तरी आरोग्यसेवा पुरविणारी यंत्रणा, प्रशासन व लोक केंद्रीय व्यवस्थापन, आर्थिक नियोजन आणि आरोग्य संवर्धनासाठी विविध सेवांच्या सुसूत्रीकरणासह राजकीय इच्छाशक्ती असेल तर हे सहज शक्य आहे, असे साथी संस्थेने अभ्यासांती म्हटले आहे.
सर्वसमावेशक संकल्पनेला प्राधान्य देताना निरनिराळ्या सार्वजनिक सेवांचे एकात्मीकरण गरजेचे आहे. यामध्ये सार्वजनिक आरोग्य खाते, वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न इस्पितळे, नगरपालिका, महानगरपालिका, ईएसआयएस, रेल्वे बोर्ड, सार्वजनिक क्षेत्रातील कारखाने आदींनी चालवलेले दवाखाने, इस्पितळे अशी सर्व आरोग्य केंद्रे सध्या असंलग्न पद्धतीने काम करत आहेत. त्यांचे एकात्मीकरण करून सर्व नागरिकांना ते उपलब्ध असणारी आरोग्य सेवेची एक समग्र यंत्रणा उभी राहणे गरजेचे आहे. आरोग्य सेवांचे सक्षमीकरण करताना ‘आशा’ कार्यक्रमात सुधारणा व्हायला हवी. दर हजारऐवजी पाचशे लोकांमागे एक आशा. तिला अधिक ज्ञान, कौशल्य, औषधे, अधिक जबाबदाऱ्या व नियमित मानधन द्यायला हवे, जेणेकरून साधे प्राथमिक उपचार देणे यासोबत रुग्ण सल्लागार म्हणून ती आपले कर्तव्य उत्तमरीत्या पार पाडू शकेल, असे साथीने सुचविले आहे.
तसेच ग्रामीण उपकेंद्राचा दर्जा व भूमिका सुधारून तिथे एका कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी किंवा एक सक्षम परिचारिकेमार्फत प्राथमिक डॉक्टरी उपचार होऊ शकतील. तसेच पाण्याचे र्निजतुकीकरण, सार्वजनिक स्वच्छता, बालकांना पूरक आहार अशा सार्वजनिक आरोग्यविषयीच्या प्रश्नांवर लोकांसमवेत काम व देखरेख करण्यासाठी उपकेंद्रामध्ये सार्वजनिक आरोग्य सेवकांची नेमणूक करण्यात यावी, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्याची नेमणूक करून सार्वजनिक आरोग्यासाठीची आवश्यक कामे करण्यासाठी आरोग्य देखरेख समित्यांवर त्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असेही सुचविण्यात आले आहे.डॉक्टरादी कर्मचाऱ्यांची पुरेशी भरती करणे गरजेचे आहे. जिथे अपुरे पडेल त्या ठिकाणी छोटे दवाखाने, इस्पितळे, प्रामाणिक धर्मादाय इस्पितळे या माध्यमातून काम करता येऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयात २४ बाय ७ च्या अंतर्गत अखंड रुग्णसेवा गरजेची आहे. आपल्याकडे ग्रामीण भागात आलेले वैद्यकीय अधिकारी पुढील शिक्षणासाठी यातील पळवाटा शोधतात. पदव्युत्तर शिक्षण नुकतेच पुर्ण केलेल्या डॉक्टरांना तिथे दोन वर्षे नोकरी सक्ती करत एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रशिक्षणातून क्षमता वाढवत तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भरून काढता येईल. शहरी भागात सार्वजनिक आरोग्य खाते व नगर पालिका यांच्या सुसूत्रता येण्यासाठी शहरी आरोग्य संचालनालयाची स्थापना करत त्रिस्तरीय रचनेच्या पध्दतीने काम करता येईल. सर्वप्रथम शहरात प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी, द्वितीय पातळीवर सेवा देणारे इस्पितळे आणि प्रत्येक जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न इस्पितळे या माध्यमातून प्रभावीपणे काम करता येऊ शकते, असे अहवालात म्हटले आहे. मात्र या सेवासुविधा प्रभावीपणे अमलात येण्यासाठी सुसंघटित, संदर्भ सेवा व्यवस्था यासह सम्रग रुग्ण-वाहतूक व्यवस्थेची उभारणी गरजेची आहे, याकडे साथीने लक्ष वेधले आहे.