गुंडांच्या विरोधात सात्त्विक वृत्ती दाखवली तर तो आपल्याला जास्तच त्रास देतो. त्याला दटावले तर तो पुन्हा उपद्रव देण्याचे धाडस करत नाही. आपल्या राज्यकर्त्यांनी हाच संदेश चीनला द्यावा, असा सूर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाने आयोजित केलेल्या एका परिसंवादात व्यक्त करण्यात आला.
सावरकरांच्या १३१ व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात ले. कर्नल  केशव पुणतांबेकर, ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन, भारत-चीन संबंधावरील अभ्यासक नितीन शास्त्री सहभागी झाले होते. द्वारकानाथ संझगिरी यांनी चर्चेचे सूत्रसंचालन केले.
 महाजन यांनी सांगितले की, चीनपुरस्कृत नक्षलवाद हा देशाच्या चाळीस टक्के क्षेत्रफळात पसरला आहे. मात्र प्रसार माध्यमे आणि राजकीय मंडळी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. हा नक्षलवाद मनात आणले तर समूळ नष्ट करता येऊ शकतो. तसे झाले तर चीनची मस्ती कमी होऊ शकते. तर शास्त्री म्हणाले की, चीनने घुसखोरी करत आता सीमेलगत रस्ते व रेल्वेरुळ बांधण्यास सुरुवात केली आहे. युद्धाची तयारी म्हणून अगोदरच पायाभूत सुविधा सीमेलगत उपलब्ध करून ठेवल्या जात आहेत. त्यामुळे सैनिकांची रसद व युद्धसामग्रीची ने-आण करण्यात भारतापेक्षा चीन सरस ठरत आहे.
भारत-चीन युद्धात राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची असून ती १९६२ मध्ये नव्हती आणि आजही नाही. आपले सैन्य युद्धभूमीवर चीनला हरवू शकेल. पण राजकीय स्तरावर मात्र आपण सपशेल हार मानतो, असे परखड मत कर्नल पुणतांबेकर यांनी व्यक्त केले.