देशालाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय समुदायाला हादरवून सोडणाऱ्या भोपाळ वायू दुर्घटनेला मंगळवार २ डिसेंबर रोजी ३० वर्षे पूर्ण झाली. तीन दशकांचा काळ लोटला तरी विषारी वायूमुळे दहा हजारांहून अधिक बळी घेणाऱ्या आणि इतर हजारोंना आयुष्यभराचा त्रास मागे ठेवणाऱ्या या दुर्घटनेचे व्रण कायम आहेत, मात्र दुर्दैवाने त्यापासून बोध घेतला नाही हेच उल्हासनगरमधील घटनेने दाखवून दिले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या राज्यातील सर्वात दाटीवाटीच्या नागरी परिसरात वाहनांची गर्दी असो, की कारखान्यांचा धूर वा रस्त्यावरील धूळ वायू प्रदूषण शिगेला पोहोचले आहे. रोज थोडा थोडा विषारी वायू लोकांच्या शरीरात नाका-तोंडावाटे जात आहे. आलिशान वातानुकूलित गाडय़ांमधून फिरणाऱ्या नेत्या-प्रशासकीय अधिकाऱ्यांना याचे कसलेही सोयरसुतक नाही.. मुंबई महानगर प्रदेशातील वायू प्रदूषणाच्या आढाव्यात हेच भीषण वास्तव अधोरेखित झाले.. ३० वर्षांपूर्वी स्वच्छ पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागेल अशी कल्पना कुणी केली नव्हती. आज ती परिस्थिती आली.. आता स्वच्छ हवेबाबत हेच होण्याची भीती आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रात दररोज धडधड करणाऱ्या शेकडो दगडखाणी, रासायनिक कारखाने, मुंबई, गोवा, जेएनपीटीकडे जाणारी लाखो गाडय़ांची जड वाहतूक, विकासाच्या नावाखाली सुरू असलेला नागरी कामांचा सपाटा यामुळे हवेतील सल्फर व नायट्रोजन डायऑक्साइड आणि पीएम दहा या प्रदूषणकारी घटकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. थंडीचा महिना सुरू झाल्यानंतर हे प्रदूषण अधिक गडद दिसून येत असून सकाळी वाशी, सानपाडा, तुर्भे, घणसोली या भागांत आकाशाने प्रदूषणयुक्त हवेची चादर ओढली असल्याचे चित्र दिसून येते. वातावरणातील शुद्ध हवेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणामुळे झपाटय़ाने वाढणाऱ्या नवी मुंबईत स्वच्छ व शुद्ध हवेची ठिकाणे शोधण्याची वेळ नागरिकांवर येते. रासायनिक कारखाने असलेल्या ठिकाणी नागरी वसाहत उभी करू नये या राज्य शासनाच्या निर्णयाला ४५ वर्षांपूर्वी नवी मुंबईत सर्वप्रथम हरताळ फासण्यात आला. पश्चिम पटय़ात औद्योगिक वसाहत पूर्णपणे कार्यान्वित झालेली असताना आठ वर्षांनी नागरी वसाहतीचा नवी मुंबई शहर प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यामुळे रासायनिक कारखाने, धुलीकण आणि आवाजाचे प्रदूषण टिपेला पोहचविणाऱ्या दगडखाणी, सर्वाधिक वाहतूक असणारे मुख्य रस्ते यामुळे अलीकडे नवी मुंबईतील रहिवाशांची सकाळ प्रदूषणयुक्त हवेचा श्वास घेण्यापासून सुरू होत आहे. त्यामुळेच शहरात नाक, घसा, फुप्फुस्साचे विकार असलेले रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळून येत असून डॉक्टरांची यामुळे चंगळ झाली आहे. अशुद्ध हवेमुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन रुग्ण दगावण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. नवी मुंबई त्याला अपवाद नसून जागतिक आरोग्य संस्थेच्या सव्‍‌र्हेक्षणानुसार जगातील तीन कोटी ७० लाख नागरिक हे केवळ अशुद्ध हवेचे बळी असल्याचे आढळून आले आहे. नवी मुंबई पालिकेने ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे येथे हवा गुणवत्ता तपासणी केंद्रे सुरू केली आहेत, पण त्यातील ऐरोली येथील केंद्र बंद आहे. त्याच्यामार्फत हवेतील आर्द्रता, प्रदूषण यांची दररोज तपासणी केली जाते. २०१३-१४ च्या पर्यावरणविषयक अहवालानुसार प्रदूषणाची ही मात्रा कमी असली तरी पीएम दहा या घटकाची मात्रा वाढल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत आम्ल वर्षांवाने काही भागाला अभिषेक घातला. सल्फर डाय ऑक्साइडचे हवेतील प्रमाण वाढल्याने सल्फ्युरिक अ‍ॅसिडची निर्मिती होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सल्फरबरोबरच नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण काहीसे वाढले असून याचा परिणाम फुप्फुसाच्या आजारावर होत आहे. दहा मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे धुलीकण शरीरात जाऊन श्वसनाचा त्रास होण्याची सवय नवी मुंबईकरांना गेली अनेक वर्षे आहे. नवी मुंबईत १०३ दगडखाणी शहर निर्मिर्तीसाठी २४ तास धडधडत होत्या. त्यातील काही दगडखाणी बंद पडलेल्या असल्या तरी ही धडधड आजही कायम आहे. त्यामुळे सल्फर आणि पीएम दहा या घटकांची मात्रा तुर्भे येथील हवा गुणवत्ता केंद्रावर नेहमीच जास्त राहिलेली आहे. त्याचे परिणाम संपूर्ण शहराला भोगावे लागत आहेत.

थंडीच्या महिन्यात प्रदूषण घटकांचे विघटन लवकर होत नाही. ते खालच्या स्तरावर मोठय़ा प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे सकाळी प्रदूषणयुक्त हवेचा थर दिसून येतो. नवी मुंबईतील काही भागांत हे प्रमाण जास्त आहे. त्याला स्मोग म्हटले जाते. शहरात सध्या प्रदूषणाची मात्रा जास्त आहे, पण ती हळूहळू कमी होईल. सीबीडी, नेरुळसारख्या पूर्ण विकसित नोडमध्ये ही मात्रा कमी आहे, पण याउलट ती घणसोली, सानपाडा या भागात जास्त राहणार आहे.
मोहन डगांवकर, शहर अभियंता, नवी मुंबई पालिका.