चौकांतील प्रदूषणाने टोक गाठले
देशालाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय समुदायाला हादरवून सोडणाऱ्या भोपाळ वायू दुर्घटनेला मंगळवार २ डिसेंबर रोजी ३० वर्षे पूर्ण होत आहेत. तीन दशकांचा काळ लोटला तरी विषारी वायूमुळे दहा हजारांहून अधिक बळी घेणाऱ्या आणि इतर हजारोंना आयुष्यभराचा त्रास मागे ठेवणाऱ्या या दुर्घटनेचे व्रण कायम आहेत, मात्र दुर्दैवाने त्यापासून बोध घेतला नाही हेच उल्हासनगरमधील घटनेने दाखवून दिले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या राज्यातील सर्वात दाटीवाटीच्या नागरी परिसरात वाहनांची गर्दी असो, की कारखान्यांचा धूर वा रस्त्यावरील धूळ वायू प्रदूषण शिगेला पोहोचले आहे. रोज थोडा थोडा विषारी वायू लोकांच्या शरीरात नाका-तोंडावाटे जात आहे. आलिशान वातानुकूलित गाडय़ांमधून फिरणाऱ्या नेत्या-प्रशासकीय अधिकाऱ्यांना याचे कसलेही सोयरसुतक नाही.. मुंबई महानगर प्रदेशातील वायू प्रदूषणाच्या आढाव्यात हेच भीषण वास्तव अधोरेखित झाले.. ३० वर्षांपूर्वी स्वच्छ पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागेल अशी कल्पना कुणी केली नव्हती. आज ती परिस्थिती आली.. आता स्वच्छ हवेबाबत हेच होण्याची भीती आहे.

वाहतूक कोंडीमुळे जर्जर झालेल्या ठाणेकरांपुढे आता धूळ आणि धुराचे अत्यंत घातक असे संकट येऊन ठेपले असून शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये हवेच्या प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठल्याचा अहवाल ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने सादर केला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या वसाहतींमधून राहणाऱ्या रहिवाशांपुढे तर हे संकट अधिक गंभीर रूप धारण करून उभे ठाकले आहे. या महामार्गावरील आनंदनगर, कॅसल मिल, बाळकुम नाका, नितीन कंपनी, मुलुंड चेकनाका अशा प्रमुख चौकांमधील धूळ आणि धुराची पातळी धोकादायक पातळीपर्यंत पोहोचली आहे. ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीची धमनी मानला जाणारा गोखले मार्गही सर्वाधिक प्रदूषित बनला आहे.
ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील प्रमुख चौकांमध्ये तसेच वेगवेगळ्या मार्गावर होणाऱ्या प्रदूषणाचा गेल्या वर्षभरात सखोल अभ्यास करून यासंबंधीचा एक सविस्तर अहवाल नुकताच तयार केला आहे. या अहवालात शहरातील सर्व प्रमुख चौक प्रदूषणाचे आगार ठरू लागल्याचे स्पष्ट निरीक्षण नोंदविण्यात आले असून आनंदनगर चौकातील प्रदूषणाची पातळी तर मानवी आरोग्यास अपायकारक ठरू शकते, अशा स्वरूपाचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. कार्बन मोनोक्साइड, बेन्झीन तसेच जड धातूंचे हवेतील प्रमाण वाढल्यास श्वसनाचे तसेच चेतासंस्थेचे विकार वाढू शकतात. वायू सर्वेक्षणादरम्यान हवेतील जड धातूंचे प्रमाण काहीसे आटोक्यात असले तरी कार्बन मोनोक्साइड आणि बेन्झीनचे प्रमाण मात्र कमालीचे वाढल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
अंतर्गत मार्गावरील प्रदूषणही वाढले
पूर्व द्रुतगती महामार्गावर सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नितीन कंपनी चौक, कॅडबरी नाका, बाळकुम चौकातील प्रदूषण वाढले असताना शहरातील अंतर्गत रस्तेही धूळ, धुरात गुरफटल्याचे चित्र दिसू लागले आहे. शहरातील अंतर्गत भागातील शाहू मार्केट परिसरातील चौक हा सर्वाधीक प्रदूषित असल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने ये-जा करण्यासाठी गोखले मार्ग हा महत्त्वाचा मानला जातो. या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी मध्यंतरी या मार्गाचे काँक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. मात्र, रस्त्याच्या अवस्थेपेक्षा अरुंद मार्गिकेमुळे येथे वाहतूक कोंडी होत असल्याचे स्पष्ट झाल्याने काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव मागे पडला. या मार्गावरील शाहू चौकात वाहतूकीचे नियमन करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांवर आतापर्यंत वाहतूक पोलिसांनी विचार करून पाहिला आहे. येथील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केल्यास कोंडी सुटू शकेल, असा प्रयत्न मध्यंतरी करण्यात आला. वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रयत्न करूनही या चौकातील कोंडी सोडविण्यात अपयश आल्याने हा चौक सर्वाधिक कोंडीचा आणि तितकाच प्रदूषणाचा ठरू लागला आहे. ठाणे शहराच्या पश्चिमेकडील वर्तकनगर तसेच सावरकर नगर चौकातील प्रदूषणाची पातळीही धोकादायक स्तरावर पोहोचली आहे.
धुळीचे प्रमाणही धोकादायक
पूर्व द्रुतगती महामार्गास लागून असलेल्या वेगवेगळ्या मॉल परिसरात आठवडय़ाच्या अखेरीस धुळीचे प्रमाण धोकादायक पातळी गाठते, असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे. या काळात मॉल परिसरात वाहनांची संख्या मोठी असते. त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाणही वाढते. त्यामुळे आठवडय़ाच्या शनिवार आणि रविवारी प्रामुख्याने सायंकाळच्या वेळेत मॉल परिसर प्रदूषित बनतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. महामार्गास लागून असलेल्या सेवा रस्त्यांना लागून असलेल्या नागरी वसाहतींना धूर आणि धुळीचा मोठय़ा प्रमाणावर सामना करावा लागत असून लुइस वाडी परिसरातील रहिवाशांच्या नशिबी वाहनांच्या प्रदूषणाचे दुखणे कायम असल्याचे या अहवालावरून स्पष्ट होऊ लागले आहे.