जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक गावातील दलित वस्ती सुधार योजनेसाठी देण्यात येणाऱ्या निधीचा योग्य ठिकाणी वापर व्हावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे संयोजक व भारतीय खाद्य निगमचे सदस्य विकास तांबे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रा.संजय मंडलिक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. केंद्र व राज्य शासनामार्फत ग्रामीण भागातील दलित मागासवर्गीय लोकांचा सर्वागीण विकास व्हावा, यासाठी दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून कोटय़वधी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक गावातील दलित वस्तीपर्यंत पोहोचविला जातो. परंतु जिल्ह्य़ातील अनेक ठिकाणी दलित वस्ती सुधार योजनेचा निधी योग्य ठिकाणी वापरला जात नाही. तरी दलित वस्ती सुधार योजनेचा निधी त्याच कामासाठी वापरावा तसेच ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातील १५ टक्के निधी मागासवर्गीय दलित समाजासाठी खर्च करावा. या मागणीचे निवेदन तांबे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक यांच्याकडे दिले. या वेळी प्रा.मंडलिक यांनी या मागणीचा विचार करून तातडीने ज्या ठिकाणी हा निधी दलित वस्तीसाठी वापरला जात नाही त्याबद्दलची माहिती त्वरित घेऊन या निधीचा वापर दलित वस्ती सुधारयोजनेसाठीच होईल, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली. या वेळी प्रशांत फाळके (भेडसगाव), हणमंत कवाळे (शाहूवाडी), पोपटराव लोंढे, चंद्रकांत महापुरे, विनोद खिलारे, प्रभाकर मुदगल, संतोष पाटील, डॉ.दिलीप शेटे आदी उपस्थित होते.