अहमदनगर जिल्ह्य़ातील जवखेडे (खालसा) येथील दलित हत्याकांडाचे तीव्र पडसाद नागपुरातही उमटू लागले आहे. या हत्याकांडाच्या निषेधार्थ विविध संघटनांतर्फे आंदोलन केले जात असून आरोपींना अटक करण्याची मागणी केली जात आहे.
अहमदनगर जिल्ह्य़ातील जवखेडे येथील जाधव कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह विहिरीत टाकण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यास पोलसांना अद्याप यश आले नाही. त्यामुळे दलित संघटनांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा संपूर्ण राज्यातच तीव्र निषेध व्यक्त होत असतानाच नागपुरातही त्याचे पडसाद उमटू लागले आहे. नागपुरातील विविध संघटनाही रस्त्यावर उतरत असून न्यायाची मागणी करत आहेत. या घटनेचा मानवाधिकार रक्षा समितीचे अध्यक्ष दिलीप नानवटे व सुदर्शन गोडघाटे यांनी तीव्र निधेष केला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. दलित बांधवांची जातीयवादातून अशाप्रकारे हत्या करणे ही घटना समाजाला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या हत्याकांडातील आरोपींना अटक न केल्यास शहरात बंद पाळण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
जवखेडा (खालसा) गावातील तिहेरी ह्त्याकांडामुळे पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. नगर जिल्ह्य़ात दलित अत्याचाराची शेकडो प्रकरणे घडली. आता तर अमानुष हत्येद्वारे क्रौर्याची सीमा गाठली जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव श्याम काळे, शहर सचिव अजय शाहू, रमेश जयसिंगपुरे, बाळ अलोणी, अनुप बोरकर, राजेश जांभुळकर यांनी केली आहे.
जवखेडा (खालसा) येथील दलित हत्याकांडाचा ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने निषेध करण्यात आला. या हत्याकांडातील दोषींना त्वरित अटक करण्यात यावी, जलदगती न्यायालयात खटला चालवण्यात यावा, हत्याकांडातील दोषींची संपत्ती जप्त करण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन समता सैनिक दलाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांना दिले. याप्रसंगी दादाराव अंबादे, राहुल सोमकुवर, डॉ. संजय गजभिये, अवधूत मानवटकर, डी.बी. चंदनखेडे, आर.एस. जावळे, संजय दमके, सचिन कांबळे, पुरुषोत्तम भोंगाडे, तिलकचंद टेंभूर्णे, मधुकर पाटील उपस्थित होते.
या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)तर्फे तीव्र निषेध करण्यात आला. तसेच पक्षाचे कार्यकर्ते आंबेडकरी अनुयायांनी आनंद बुद्ध विहार परिसरात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. या हत्याकांडातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशा घटना घडू नये यासाठी शासनाने कठोर पावले उचलावी, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात दिनेश बन्सोड, बाळू घरडे, उत्तम पाटील, सुखदेव मेश्राम, सुधीर ढोके, महिपाल गेडाम, राजू डोंगरे, मंगेश वानखेडे, भरत लांडगे, रमेश कांबळे, ईश्वर वाघमारे, किशोर बांबोले, विनोद घरडे आगी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे अमरावती मार्गावरील सवरेदय आश्रम परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले. जाधव कुटुंबियांच्या मारेकऱ्यांना त्वरित पकडण्यात यावे, तसेच दलितांवर होणाऱ्या अत्याचारावर आळा घालावा, अशा मागण्या याप्रसंगी करण्यात आल्या. महाराष्ट्रातील हमालाचे नेते डॉ. बाबा आढाव, सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर मेश्राम, आदींनी आंदोलन स्थळी भेट देऊन या घटनेचा निषेध केला. या धरणे आंदोलनात
विदर्भ मोलकरीण संघटनेच्या अध्यक्षा डॉ. रूपा कुळकर्णी, सचिव विलास भोंगाडे, प्रकल्प प्रमुख सुजाता भोंगाडे, कार्यकर्त्यां छाया चवळे, संगीता अंबारे, पुष्पा बावनकुळे, सुरेश ढगे, सुमन कांबळे, सुरेखा डोंगरे, वंदना भगत सहभागी झाल्या होत्या.