कोल्हापूर महापालिकेच्या महासभेमध्ये रस्ते प्रकल्पासाठी ठराव केला होता, तेव्हा कोल्हापूरची जनता झोपली होती काय, अशे संतापजनक विधान राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी नागपूर येथे अधिवेशन काळामध्ये केले. या त्यांच्या विधानाचा निषेध कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने केला आहे.    
टोलविरोधी कृती समितीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की भुजबळ यांनी विधान करण्यापूर्वी पूर्ण माहिती घेण्याची तसदी घेतली असती तर असे उद्गार काढलेच नसते. कारण ज्या दिवशी हा ठराव महापालिकेच्या महासभेच्या अजेंडय़ावर होता, त्याच दिवशी असा ठराव करू नये यासाठी सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी शिवाजी चौक येथे मंडप उभारून ठिय्या आंदोलन केले होते. महापालिकेमध्ये सहभागी असणाऱ्या कोल्हापूरच्या तमाम नगरसेवकांचे तत्कालीन कारभारी पद सांभाळणाऱ्या काही मोजक्या मंडळींना बाहेरून काही बडय़ा आसामींचे फोन आले व फोन करणाऱ्यांनी हा ठराव पारित करा, असा आदेश दिला. ही वस्तुस्थिती त्या वेळच्या सभागृहामध्ये नगरसेवक म्हणून उपस्थित असणारे अनेक नगरसेवक आता खासगीत व जाहीररीत्या सांगत आहेत. मग हा दूरध्वनी करणारे भुजबळच होते का, असा प्रश्न कोल्हापूरच्या जनतेसमोर उपस्थित होत आहे.