शिक्षण, आरोग्य, पोषण, जनजागरण व जनसंवाद मोहिमेला जिल्ह्य़ात गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गावच्या विकासासाठी लोकसहभागाशिवाय पर्याय नाही. लोकसहभाग हाच या जनजागरण मोहिमेचा मूळ गाभा असल्याचे मत राज्यमंत्री फौजिया खान यांनी व्यक्त केले.
पिंगळी गावात आयोजित कार्यक्रमात फौजिया खान बोलत होत्या. सरपंच उज्ज्वला खाकरे, अंगद गरूड, सुरेश वरपुडकर, एन. पी. मित्रगोत्री, विश्वंभर गावंडे, डी. व्ही निला, शोभा राऊत, डॉ. ई. डी. माले, डॉ. एस. व्ही देशपांडे आदी उपस्थित होते. या मोहिमेनिमित्त अनेक गावांत रंगरंगोटी करण्यात आली. शैक्षणिक व आरोग्य प्रदर्शन लावण्यात आले. गावकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी प्राधान्य दिले असून प्रश्न सोडविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा व राज्य पातळीवरील प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करून गावकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे राज्यमंत्री खान म्हणाल्या.