मिरज-पंढरपूर रेल्वेने पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे म्हसोबाचे दर्शन घेण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या पितापुत्रास क्रॉसिंगजवळ रेल्वेची धडक बसल्याने ते दोघेही जागीच ठार झाले. त्यांच्यासमवेत असलेला आणखी एक जणही या अपघातात ठार झाला. हा अपघात गुरूवारी झाला. रामचंद्र भगवान चव्हाण (वय ३२) व त्यांचा मुलगा रणजित रामचंद्र चव्हाण (वय ६) तसेच शशिकांत राजेंद्र चंदनशिवे  ( वय१६) हे आपल्या दुचाकीवरून अमावस्येच्या निमित्ताने लोटे वाडी येथे म्हसोबाच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी क्रॉसिंग जवळ त्यांच्या दुचाकीला मिरज-पंढरपूर गाडीची धडक बसली, त्यात दुचाकीवरील तिघेही ठार झाले. खर्डी, बोहळी, उंबरगाव येथे रेल्वेने गेट करावे अशी मागणी या तीन गावांच्या ग्रामपंचायतींनी केली आहे.