प्रखर उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या सोलापूरकरांना गुरुवारी सायंकाळी अचानकपणे वादळी वाऱ्यासह पाऊस बरसल्याने काहीसा दिलासा मिळाला. मात्र वादळी वारे प्रचंड प्रमाणात वाहिल्यामुळे काही भागांत झाडे उन्मळून कोसळली, तर घरांच्या छपरांवरील पत्रे उडून गेल्याचे सांगण्यात आले.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोलापूरचे तापमान वाढून ४१ अंश सेल्सियसच्या घरात गेले आहे. गुरुवारीदेखील तापमानाचा पारा ३१ अंशावर स्थिरावला होता. तर आद्र्रतेचे प्रमाण २८ टक्के इतके होते. सायंकाळी मात्र वातावरणात लक्षणीय बदल होऊन आकाशात काळय़ाकुट्ट ढगांची गर्दी झाली आणि काही वेळातच वादळी वाऱ्यांचा जोर वाढला. वाऱ्याचा गोंगाट वाढला तसा त्याचा परिणाम रस्त्यावरील सामान्य जनजीवनावर झाला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे लहानमोठे वृक्ष उन्मळून कोसळल्याचे वृत्त आहे. याशिवाय सामान्य गरीब वर्गाच्या घराच्या छतांवरील पत्रे उडून गेले. अनेक भागांतील वीजपुरवठाही खंडित झाला. त्यामुळे सर्वाची दैना उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. वादळी वाऱ्यासह नंतर पावसाला प्रारंभ झाला. वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या सोलापूरकरांना या पावसाने किंचितसा दिलासा मिळाला असला तरी वादळी वाऱ्यामुळे भीतिदायक परिस्थिती दिसून आली.