राष्ट्रसंतांनी स्वातंत्र्यासाठी जनजागृती केली. दोनदा इंग्रजांनी त्यांना कारावासही केला, परंतु महाराजांनी आपले सामाजिक कार्य थांबविले नाही. भजन, कीर्तन, साहित्य आणि खंजरीच्या माध्यमातून त्यांनी भोळ्याभाबडय़ा जनतेत परिवर्तन घडविले, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले. राळेगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला संमेलनाचे अध्यक्ष कवी प्रा.फ.मु.शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष व संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. वसंत पुरके, ज्येष्ठ साहित्यिक-संपादक सुरेश व्दादशीवार, डॉ.शरद कळणावत, वामन तेलंग, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, गुरु देव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी बबनराव वानखडे, अ.भा.गुरु देव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे, ज्ञानेश्वर रक्षक, पंचायत समिती सभापती अशोक केवटे, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद धुर्वे, सीमा तेलंगे आदी उपिस्थत होते.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून अंधश्रध्दा, व्यसन, अज्ञान यांचा कडाडून विरोध केला. गरिबी, ग्रामआरोग्य अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकून समाजाचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महाराजांचे साहित्य देशव्यापी आहे. भजन-कीर्तनाच्या माध्यमातून स्वातंत्र चळवळीला बळ देण्यासोबतच जनजागृती त्यांनी केली. आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ कवी प्रा.फ.मु.शिंदे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खऱ्या अर्थाने समाजशिक्षक, समाजमनावर संस्कार करणारे शिक्षक, प्रतिभाशाली लेखक व विचारवंत होते. ढोंगीपणा महाराजांना कधीही मान्य नव्हता. प्रत्येकाचे अंत:करण स्वच्छ असावे, अशी त्यांची धारणा होती, असे सांगून यावेळी त्यांनी समाजातील वाईट चालीरितींवरही प्रकाश टाकला.प्रा.वसंत पुरके यांनी यावेळी स्वागतापर भाषणात सुंदर विचारांची पेरणी व्हावी, राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून हे साहित्य संमेलन असल्याचे सांगितले. साहित्य माणुसकीला पाझर फोडणारे माध्यम आहे. ती ह्रदयाशी संबंधित कला आहे. तुकडोजी महाराजांनी आपल्या साहित्यातून ग्रामीण लोकांच्या ह्रदयात हात घातला, असे ते म्हणाले. यावेळी प्रा. सुरेश व्दादशीवार यांनी तुकडोजी महाराजांनी खेडय़ांच्या समृध्दीचा मार्ग ग्रामगीतेतून सांगितला, असे सांगितले. डॉ. शरद कळणावत यांनी राष्ट्रसंतांचे विचार दूरपर्यंत पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन केले. सकाळी उद्घाटनापूर्वी ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात राष्ट्रसंतांचे भक्त, साहित्यिक, विद्यार्थी व नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. उद्घाटन कार्यक्रमाचे संचलन कैलाश राऊत यांनी, तर आभार विलास भोयर यांनी मानले.