तालुक्यातील राशिन येथे अतिक्रमण विरोधी मोहिमेच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आला. अतिक्रमणे हटवण्याच्या नावाखाली येथील बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचा अधिकाऱ्यांचा डाव आहे असा आरोप युवक काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी आंदोलकांसमोर बोलताना केला. सुमारे दीड तास हे आंदोलन सुरू होते.
देशमुख म्हणाले, दुष्काळामुळे परिसरात चारा व पाणी टंचाई आहे. त्यातच गावातून जाणारा दौन्ड-उस्मानाबाद व बारामती-नगर या रस्त्यांवर असेलली दुकाने काढण्यासाठी प्रशासनाने अतिक्रमणांच्या नाटिसा दिल्या आहेत. हा खोडासाळपणा आहे. तो तात्काळ बंद करा अन्यथा त्याचे गंभीर परीणाम होतील असा इशारा राजेंद्र देशमुख यांनी दिला. रविंद्र मासाळ, शहाजीराजे भोसले, संतोष काशिद, अविनाश सायकर, दिपक थोरात व सुभाष जाधव यांची यावेळी भाषणे झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता बनसोडे यांनी राशिन गावाबाहेरून बायपास रस्त्याचा प्रस्ताव प्रांताधिकारी व तहसीलदारांना पाठवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.