तालुक्यात आठवडय़ापासून संततधार सुरू असून आतापर्यंत ६०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे तालुक्यात सात ते आठ घरांची पडछड झाली असून सूर्यदर्शन होत नसल्याने पिकांवर रोग पडू लागला आहे.यंदा तालुक्यावर पावसाने चांगलीच कृपा केली आहे. जोरदार नसला तरी संततधार कायम आहे. जुलैमध्येच ६०० मिमी पावसाची नोंद तालुक्यात प्रथमच होत आहे. २३ जुलै रोजी तर एका दिवसात १०३ मिमी पावसाची नोंद झाली होती. भीज पावसामुळे मातीच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत सात ते आठ घरांची पडछड झाली असून तहसीलदार नितीन गवळी यांनी तलाठय़ांना पंचनामा करण्याचे निर्देश दिले आहेत. पावसामुळे मूग व सोयाबीनचे अधिक प्रमाणात नुकसान झाले असून संकरित ज्वारी व मका पिकावर रोग पसरला आहे. तालुक्यातून जाणाऱ्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर या आंतरराज्य महामार्गासह धनवाडी, कठोरा, सनपुळे, हिंगोणे या गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.