अशोक पाटील यांच्या खूनप्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी खून प्रकरणातील संशयाची सुई गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे वळली असल्याचा संशय व्यक्त करून खून प्रकरणाची नि:पक्ष चौकशी होण्यासाठी मंत्री पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तर गृहराज्यमंत्री पाटील यांनी या खून प्रकरणाशी आपला कसलाही संबंध नसल्याचे स्पष्ट करून पोलीस तपासाला पूर्णपणे सहकार्य केले जात असून तपासानंतर वस्तुस्थिती उघड होईल, असे मत व्यक्त केले आहे.