एकविसावे शतक हे तंत्रज्ञान क्रांतीचे शतक आहे. हे शतक डोळ्यासमोर ठेवून मूल्यांवर आधारित नवीन शिक्षणपध्दतीचा विचार करायला हवा. तंत्रज्ञानाची सांगड आणि मूल्यांची जपवणूक हे आव्हान समजून नवीन शिक्षण पध्दती अमलात आणण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांनी केले.येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि अखिल भारतीय संशोधन संस्था यांच्या वतीने विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्त विद्यापीटाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अरूण जामकर हे होते. शिक्षण, सामाजिक विकास, शिक्षण आणि औद्योगिक विकास, शिक्षण आणि सांस्कृतिक विकास या एकमेकांशी संबंधित बाबी आहेत. याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्याची गरज डॉ. ताकवले यांनी व्यक्त केली. औद्योगिक विकास साधण्यासाठी स्वयोग, सहयोग आणि उद्योग या त्रिसूत्रीचा वापर झाल्यास विकासाला गती मिळेल. आधुनिक युगात तंत्रज्ञानातून सर्व समाजाला शिक्षित करता येईल असा विश्वास निर्माण झाला आहे. त्यातून समाज परिवर्तन घडून येईल. हे या पध्दतीचे मोठे यश असेल. ज्ञान आणि विकास एकमेकांना पूरक असल्याने शैक्षणिक विकासाला गती मिळेल, असेही डॉ. ताकवले यांनी सांगितले.यावेळी डॉ. जामकर यांनी सध्याची बदलती परिस्थिती लक्षात घेता आता शैक्षणिक संस्थांसमोरची आव्हानेही बदलत असल्याचे मत मांडले. परिषदेत बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ यांच्यासह भारतातील २० राज्यांमधील १४० प्रतिनिधी उपस्थित होते. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे प्रभारी संचालक डॉ. सुरेंद्र पाटोळे यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांनी आभार मानले.