मानाच्या काठय़ांचा विजेच्या तारेला स्पर्श होऊन दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना खंडोबा यात्रेत घडली. या प्रकारात अन्य तीनजण जखमी झाले. या दुर्घटनेमुळे सोमवारी पालिकेच्या वतीने आयोजित कुस्ती स्पर्धा रद्द करण्यात आल्या.
नळदुर्ग येथील खंडोबा यात्रेस २६ जानेवारीपासून प्रारंभ झाला. यात्रेच्या मुख्य दिवशी रविवारी मोठी गर्दी झाली होती. सोमवारी पहाटे खंडोबाची छबिना मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मानाच्या काठय़ा सहभागी होत्या. मात्र, विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने नारायण कोकणे (वय २४) व संतोष दासू चव्हाण (वय २७, दोघे नळदुर्ग) यांचा जागीच मृत्यू झाला. दीपक नारायण कोकणे, प्रकाश कोकणे व सखाराम मल्हारी कोकणे हे तिघे जखमी झाले. जखमींपैकी प्रकाश कोकणे यांची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे खंडोबा यात्रेस गालबोट लागले. यात्रेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.